धर्माबाद (नांदेड) : शासकीय मोजणीसाठी हजारो रुपयांचे शुल्क भरून सहा-सहा महिने उलटले, तरी मोजणीची तारीख मिळत नसल्याने धर्माबाद तालुक्यातील शेतकरी सध्या प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. (Jamin Mojani)
पेरणीपूर्वी शेतातील बांधाचे वाद मिटवण्यासाठी शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र पदरी केवळ निराशा आणि उडवाउडवीची उत्तरे पडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Jamin Mojani)
मृग नक्षत्राची धास्ती; वादाची ठिणगी पडण्याची भीती
दोन महिन्यांवर मृग नक्षत्र येऊन ठेपले असून पेरणीची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यातील अनेक शेतजमिनींचे वाद सीमेवरून (बांधावरून) अडकलेले आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोजणी झाल्यास हे वाद मिटू शकतात. मात्र, मोजणी रखडल्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये आपापसात संघर्ष होऊन ही प्रकरणे थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
'तारीख पे तारीख'
शेतकऱ्यांनी मोजणीसाठी रीतसर शुल्क भरले आहे, तरीही त्यांना तारखा दिल्या जात नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, काही शेतकऱ्यांना तारीख मिळाली तरी कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत.
"शेतात चिखल आहे" किंवा "पाऊस आहे" अशी तांत्रिक कारणे देऊन कर्मचारी मोजणी न करताच परत फिरतात. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो, कारण त्यांना पुन्हा नव्याने शुल्क भरावे लागते, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
कार्यालयात शुकशुकाट; उपअधीक्षक दौऱ्यावर?
धर्माबाद भूमी अभिलेख कार्यालयातील मनुष्यबळाचा अभाव हा कळीचा मुद्दा ठरत आहे. कार्यालयात गेल्यास केवळ एक-दोन कर्मचारी दिसतात.
उपअधीक्षक साहेब विचारणा केल्यास "दौऱ्यावर आहेत" असे उत्तर दिले जाते. माहिती विचारणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाने वागणूक देण्याऐवजी कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
* प्रलंबित मोजणी अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून तारखा जाहीर कराव्यात.
* मोजणीसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
* कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक मिळावी.
* उन्हाळ्यात पिके नसताना मोजणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
