Jalna Anudan ghotala : जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदानातील तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांच्या घोटाळ्याचा तपास अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडे (EoW) वर्ग करण्यात आला आहे.(Jalna Anudan ghotala)
या प्रकरणातील २२ तलाठी व ६ जणांसह एकूण २८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनेक संशयित आरोपी सध्या संपर्काबाहेर (Not Reachable) गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.(Jalna Anudan ghotala)
दरम्यान, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणातील आरोपींची संख्या चौकशीनंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे.(Jalna Anudan ghotala)
गुन्हा कसा उघडकीस आला?
सन २०२२ ते २०२४ या काळात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या निधीचे वाटप करताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ९ ऑगस्ट रोजी जालन्यातील दौऱ्यादरम्यान या घोटाळ्याचा तपास करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, २२ तलाठे आणि ६ जणांवर गुन्हा दाखल करून हा तपास पुढे ढकलण्यात आला.
घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने अंबड पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा एकाच दिवसात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
संगणकातील माहिती डिलीट
महसूल विभागाने अनुदानाचे तपशील ई-मेल आयडी व संगणकाद्वारे अपलोड केले होते. मात्र, आरोपींनी संगणक व ई-मेल आयडीतील महत्वाची माहिती डिलीट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे पोलिसांनी महसूल विभागातील संगणक जप्त करून तपासणी सुरू केली आहे.यासोबतच आरोपी कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांचे बँक खात्यांची, मोबाईल कॉल डिटेल्सची तपासणी करण्यात येणार आहे.
नुकसान पंचनामे करण्याचे आदेश
जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्पष्ट केले की, पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच केले पाहिजेत, घरी बसून नव्हे असे आदेश महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
बदनापूर तालुक्यातच आतापर्यंत ४५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वसुलीबाबत अनिश्चितता
या घोटाळ्याचा उलगडा झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आरोपी कर्मचारी व ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल असे जाहीर केले होते. मात्र, आतापर्यंत किती रक्कम वसूल झाली याबाबत प्रशासनाकडे ठोस माहिती नाही, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी पत्रकारांना सांगितले.
२४ कोटी की ४२ कोटींचा घोटाळा?
यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे घोटाळ्याची खरी रक्कम किती?
तत्कालीन जिल्हाधिकारी पांचाळ यांनी ४२ कोटी ५० लाखांचा अपहार झाल्याचे सांगितले होते.
मात्र, अंबड पोलिस ठाण्यात महसूल विभागाकडून दिलेल्या फिर्यादीमध्ये २४ कोटी ५० लाखांचा अपहार झाल्याचे नमूद आहे. यामुळे या प्रकरणाबाबत अजूनही अनेक शंका उपस्थित होत आहेत.
जालना जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यामुळे प्रकरणाला वेग येणार असला तरी आरोपी अजूनही फरार आहेत. रक्कमेच्या वसुलीबाबत आणि घोटाळ्याच्या खरी व्याप्तीबाबत प्रशासन स्पष्ट उत्तर देऊ शकलेले नाही.