वाशिम : जिल्ह्यातील पारवा (ता.कारंजा) येथील प्रयोगशील शेतकरी शिवदास ताठे यांनी पारंपरिक पिकांसोबतच रोख रक्कम मिळवून देणाऱ्या बहुपर्यायी पिकांची कास धरली आहे.
त्यांच्या शेतात सध्या गहू, चिया आणि कांद्यासोबतच फणस, लिंबू आणि आंब्याची शेकडो झाडे उभी असून, शेताच्या धुऱ्यावर नारळ आणि शेवग्याची असंख्य झाडे बहरली आहेत. या माध्यमातून लाखोंचे उत्पादन घेण्याची किमया ताठे यांनी केली आहे.
शेतकरी ताठे यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यातील ३ एकरांवर त्यांनी ३०० झाडांची आंब्याची बाग विकसित केली आहे. यासह दीड एकरावर लिंबूची २०० झाडे असून, शेताच्या धुऱ्यावर शेवग्याची १५०, सीताफळाची २००, फणसाची २५ आणि नारळाची ७५ झाडे आहेत.
सध्या आंब्याची सर्वच झाडे मोहोरली असून, विक्रमी उत्पादन मिळण्याची अपेक्षा ताठे यांनी व्यक्त केली. गतवर्षी लिंबू विक्रीतून पावनेदोन लाख रुपये, शेवगा विक्रीतून ७० हजार रुपये, कांदा विक्रीतून सव्वादोन लाख रुपये आणि सीताफळ विक्रीतून १ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
४० ट्रॉली शेणखताचा वापर
शेतकरी शिवदास ताठे हे सोयाबीन, गहू यांसारख्या पिकांसाठीच काही प्रमाणात रासायनिक खताचा वापर करतात. फळपिके आणि चिया, कांदा ही पिके मात्र पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने घेतली जात आहेत. दरवर्षी ३० ते ४० ट्रॉली शेणखताचा वापर केला जात असल्याचे शेतकरी ताठे यांनी सांगितले.
शेवग्याची अकोला, अमरावतीत; कांद्याची नागपुरात विक्री
शेतात उत्पादित कांद्याची नागपूर जिल्ह्यातील कळंबा येथील बाजारात विक्री केली जाते; तर अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये शेवगा विकत असल्याचे शेतकरी शिवदास ताठे यांनी सांगितले.
