नागपूर : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विदर्भाच्या सिंचन अनुशेषाबाबत विधानसभेत दिलेली माहिती गोंधळात टाकणारी आहे, असा आरोप लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीचे संयोजक अॅड. अविनाश काळे यांनी केला आहे. तसेच, विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका किती आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी केली आहे.
महाजन यांनी संबंधित माहिती देताना सुरुवातीला जून-२०२५ पर्यंत विदर्भातील ७ लाख ८४ हजार ७२० हेक्टरपैकी ७ लाख ४१ हजार १८५ हेक्टरचा सिंचन अनुशेष भरून काढण्यात आला आहे, असे सांगितले तर, त्यानंतर विदर्भातील ८४ प्रकल्पांची एकूण सिंचनक्षमता १४ लाख ५६ हजार हेक्टर असून जून-२०२५ पर्यंत ७ लाख ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे, असे सांगितले.
यापैकी पहिली माहिती विचारात घेतली तर, सिंचनाचा अनुशेष केवळ ४३ हजार ५३५ हेक्टर बाकी राहतो आणि दुसऱ्या माहितीनुसार सिंचनाचा अनुशेष ७ लाख २० हजार हेक्टर असल्याचा अर्थ निघतो.
परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका आहे तरी किती? असा प्रश्न उपस्थित होतो. सरकारने यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असे काळे यांनी म्हटले आहे.
