अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, गेल्या सात दिवसांपासून बारदान्याअभावी ठप्प झालेली हमी दराची हरभरा खरेदी अखेर आजपासून (१६ एप्रिल) पासून पूर्ववत करण्यात येत आहे.(Harbhara Kharedi)
शासनाच्या पणन विभागामार्फत आवश्यक बारदाना उपलब्ध झाल्याने खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.(Harbhara Kharedi)
सात दिवस खरेदी ठप्प
जिल्ह्यातील विविध सरकारी खरेदी केंद्रांवर ९ एप्रिलपासून हरभरा खरेदी थांबविण्यात आली होती. यामागे मुख्य कारण म्हणजे बारदान्याची तीव्र कमतरता.
खरेदीसाठी आवश्यक गोण्या उपलब्ध नसल्याने केंद्रांना खरेदी प्रक्रिया थांबवावी लागली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
हमी दराकडे शेतकऱ्यांचा कल
यंदा रब्बी हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याला बाजारात हमी दरापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा सरकारी खरेदी केंद्रांकडे वाढला आहे.
शासनाने हरभऱ्यासाठी प्रति क्विंटल ५,८७५ रुपये हमी दर जाहीर केला असून, या दराने विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून खरेदी केंद्रांवर येत आहेत.
जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची स्थिती
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत ११ खरेदी केंद्रे, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत ३ केंद्रे तसेच पणन विभाग आणि नाफेडच्या माध्यमातूनही हरभरा खरेदी सुरू आहे. या सर्व केंद्रांवर आता पुन्हा नियमित खरेदी सुरू होणार आहे.
नोंदणीची मुदत संपली
हमी दराने हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांना पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी बाकी असल्यामुळे शासनाने ६ एप्रिलच्या आदेशानुसार नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली होती.
ही मुदत आता संपली असून, या कालावधीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, पण आव्हाने कायम
खरेदी पुन्हा सुरू होत असली तरी, सात दिवसांच्या खंडामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
आता खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बारदान्याच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेला अडथळा दूर झाल्याने हरभरा खरेदीला गती मिळणार असली, तरी व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : सरकार, अजून किती थांबायचं? 'या' कारणामुळे शेतकरी संतप्त
अधिक वाचा : Soybean AI Farming : धाराशिवमध्ये स्मार्ट शेतीचा प्रयोग; AI मुळे सोयाबीनचे उत्पन्न वाढले
