नंदुरबार : शेतीतील अनिश्चितता आणि निसगार्चा लहरीपणा यावर मात करण्यासाठी शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी पर्यायी शेतीकडे वळू लागला आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भगर पिकाची पेरणी करण्यात आली आहे. बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि सिंचनाच्या मर्यादा लक्षात घेता कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पारंपरिक पिकांमध्ये वाढता खर्च आणि उत्पादनातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आता कमी खर्चात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या शोधात आहेत.
भगर हे पीक कमी पाण्यात येते. तसेच त्यासाठी जास्त मशागत लागत नसल्याने या पिकाकडे कल वाढत आहे. उपवासाच्या काळात भगरला बाजारात मोठी मागणी असते. उत्पन्नाचे एक पर्यायी साधन म्हणूनही या पिकाकडे पाहिले जात आहे. भगरीचा भात तसेच लापशी आणि इतर विविध पदार्थ तयार करण्यासाठीही उपयोग होतो. पचायला हलके आणि पौष्टिक असल्यामुळे या पिकाचे महत्त्व वाढत आहे.
हवामान बदलाचा परिणाम
पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्यामुळे आणि पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पारंपरिक पिकांमध्ये जोखीम वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतऱ्यांनी कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणाऱ्या पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्पादन चांगले आले असून बाजारभाव चांगला मिळाला तर निश्चित फायदा होईल, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
रब्बी हंगामात भगर पिकाचा स्वीकार
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक भागात पाण्याची कमतरता आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहेत. भगर सारख्या पिकांचा स्वीकार आगामी काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामानातील बदल लक्षात घेऊन भगर पिकाची निवड केली. हे पीक कमी खर्चात येते आणि जोखीम कमी असते. उत्पादन चांगले आले आणि बाजारभाव मिळाला तर निश्चितच फायदा होईल.
- रणजीत वळवी, भगर उत्पादक शेतकरी
