Greasy Spot Disease : विदर्भात सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अनेक शेतकरी संत्रा फळबागांकडे वळले आहेत. संत्रा पिकातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. (Greasy Spot Disease)
मात्र, सध्या अकोला जिल्ह्यातील अकोट, पणज, तसेच तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरात संत्रा झाडांवर बुरशीजन्य 'ग्रीसी स्पॉट' (Greasy Spot) या रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.(Greasy Spot Disease)
या रोगामुळे संत्रा झाडांची ताकद कमी होऊन फुलधारणा, फळधारणा आणि पुढील बहरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Greasy Spot Disease)
वर्षभर रोगांचा विळखा
संत्रा बागांची लागवड झाल्यानंतर त्यांची निगा राखणे हे मोठे आव्हान ठरत आहे. संत्रा पिकावर वर्षभर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.
सोयाबीन किंवा कापसाच्या तुलनेत संत्र्यातून अधिक उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने बागा उभारल्या जात असल्या तरी रोगांमुळे ही अपेक्षा धोक्यात आली आहे.
काय आहे 'ग्रीसी स्पॉट' रोग?
'ग्रीसी स्पॉट' हा बुरशीजन्य रोग असून तो प्रामुख्याने संत्रा झाडांच्या पानांवर आढळतो. मात्र, त्याचा परिणाम केवळ पानांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण झाडाच्या आरोग्यावर होतो.
कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोगामुळे झाडाची अन्ननिर्मिती क्षमता कमी होते, परिणामी झाड अशक्त बनते.
ही बुरशी जमिनीवर पडलेल्या जुन्या, सुक्या पानांवर जिवंत राहते. पावसाळा, दव आणि जास्त आर्द्रता असताना या पानांवर बुरशी वाढते व सूक्ष्म बीजाणू तयार होतात.
पाऊस किंवा दव पडल्यानंतर हे बीजाणू हवेत पसरून झाडाच्या नव्या पानांच्या खालच्या बाजूस जाऊन बसतात.
बुरशी पानांच्या श्वसनछिद्रांतून आत प्रवेश करते आणि हळूहळू पेशींमध्ये वाढू लागते. साधारण दोन ते तीन महिन्यांनंतर पानांवर रोगाची लक्षणे दिसू लागतात.
रोगाची ठळक लक्षणे
सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूस फिकट पिवळसर, अनियमित डाग दिसून येतात. त्याच ठिकाणी पानांच्या खालच्या बाजूस तपकिरी ते काळपट रंगाचे, तेलकट (ग्रीसी) स्वरूपाचे डाग तयार होतात.
कालांतराने हे डाग वाढत जातात. पानांची कार्यक्षमता कमी होते, पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणात गळतात. नवीन फुट कमजोर येते आणि संपूर्ण झाड अशक्त झाल्याचे दिसते.
होणारे नुकसान
'ग्रीसी स्पॉट' रोगामुळे संत्रा बागेचे मोठे नुकसान होऊ शकते. मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्याने झाडाची अन्ननिर्मिती क्षमता घटते. झाडाची वाढ मंदावते, फुलगळ आणि लहान फळगळ वाढते.
परिणामी फळांचा आकार, वजन व दर्जा कमी होतो. याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो आणि पुढील बहरही कमकुवत येतो. त्यामुळे हा रोग केवळ पानांचा नसून संपूर्ण बागेच्या उत्पादन क्षमतेला धोका निर्माण करणारा आहे.
असे करा प्रभावी व्यवस्थापन
'ग्रीसी स्पॉट' रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे. सर्वप्रथम बागेतील स्वच्छतेवर भर द्यावा.
जमिनीवर पडलेली जुनी व सुकलेली पाने गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून बुरशीचा स्रोत कमी होईल. झाडांची योग्य छाटणी करून हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील याची काळजी घ्यावी.
तसेच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. रोगाची सुरुवात लक्षात येताच वेळेवर उपाययोजना केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांचे नियमित निरीक्षण करावे. पानांवर पिवळसर किंवा तेलकट डाग दिसताच तात्काळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य सल्ला घ्यावा.
वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या वाढत्या 'ग्रीसी स्पॉट' रोगामुळे संत्रा बागा धोक्यात असून, योग्य व्यवस्थापन व काळजी घेतल्यासच या संकटावर मात करणे शक्य आहे.
'ग्रीसी स्पॉट' रोगावर प्रभावी उपाययोजना
बाग स्वच्छता महत्त्वाची
* झाडाखाली पडलेली जुनी, सुकलेली पाने गोळा करून नष्ट करा
* हीच पाने बुरशीचा मुख्य स्रोत असल्याने ती बागेत ठेवू नयेत
*शक्य असल्यास खोल खड्ड्यात गाडणे किंवा जाळून नष्ट करणे
योग्य छाटणी
* झाडांची हवेशीर छाटणी करा
* आतल्या बाजूची दाट फांद्या काढा
* त्यामुळे सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते आणि आर्द्रता कमी होते
पानांवर थेट फवारणी करा
* फवारणी करताना पानांच्या खालच्या बाजूवर औषध पोहोचेल याची खात्री करा
* कारण बुरशी प्रामुख्याने खालच्या बाजूने प्रवेश करते
पाणी व्यवस्थापन
* पाणी साचू देऊ नका
* ठिबक सिंचनाचा वापर करा
* जास्त आर्द्रता टाळणे अत्यावश्यक
हे ही वाचा सविस्तर : Kakdi Crop : कमी खर्च, जास्त उत्पन्न; काकडी पीक ठरतंय वरदान वाचा सविस्तर
