Fruit Farming : बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आता पारंपरिक पिकांपासून दूर जाऊन शाश्वत आणि दीर्घकालीन उत्पन्न देणाऱ्या फळबागांकडे वळताना दिसत आहेत.(Fruit Farming)
याचाच प्रत्यय २०२४-२५ या हंगामात आला असून, जिल्ह्यात तब्बल १,६४१ हेक्टर शेती फळबागांखाली आणण्यात आली आहे. (Fruit Farming)
शासकीय योजनांचा लाभ आणि तुलनेने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता यामुळे हा कल वाढत असल्याचे चित्र आहे.(Fruit Farming)
हवामान बदलाचा परिणाम; फळबागांकडे कल
धाराशिव जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हवामानात मोठे बदल झाले आहेत.
कधी अतिवृष्टी, तर कधी दीर्घ पावसाचा खंड, वाढती रोगराई यामुळे पारंपरिक पिके तोट्यात जाऊ लागली आहेत.
पीकविमा आणि शासकीय मदतीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी, दीर्घकालीन स्थिर उत्पन्नासाठी शेतकरी पर्याय शोधत आहेत.
यामुळे सिंचन सुविधा असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबागांकडे वळत आहेत.
आंबा आणि केळीची आघाडी
२०२४-२५ मध्ये फळबाग लागवडीत आंबा आणि केळी या पिकांचा मोठा वाटा आहे.
आंबा : ७७५ हेक्टर
केळी : ३०१ हेक्टर
द्राक्षाचे क्षेत्र आधीपासून मोठे असले तरी बाजारातील चढ-उतार लक्षात घेता शेतकरी आता अधिक स्थिर उत्पन्न देणाऱ्या आंब्याकडे वळताना दिसत आहेत.
विविध फळपिकांचीही वाढ
जिल्ह्यात इतर फळपिकांची लागवडही वाढत आहे.
पेरू : ३७९ हेक्टर
डाळिंब : ५० हेक्टर
कागदी लिंबू : २४ हेक्टर
सीताफळ : २८ हेक्टर
नारळ : १५ हेक्टर
मोसंबी : ४ हेक्टर
यामुळे शेतीत विविधता येत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्नही स्थिर होण्यास मदत होत आहे.
वर्षनिहाय वाढती आकडेवारी
२०२२-२३ : ४५५ हेक्टर
२०२३-२४ : ७६४ हेक्टर
२०२४-२५ : १,६४१ हेक्टर
गेल्या दोन वर्षांत फळबाग लागवडीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते.
'रोहयो' आणि फुंडकर योजनेचा मोठा वाटा
फळबाग लागवडीसाठी शासकीय योजनांचा मोठा आधार मिळाला आहे.
रोजगार हमी योजना (रोहयो)
आंबा : ४७१ हेक्टर
केळी : ३०१ हेक्टर
पेरू : ५६ हेक्टर
द्राक्ष : ५५ हेक्टर
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
पेरू : ३२३ हेक्टर
आंबा : ३०४ हेक्टर
डाळिंब : ४० हेक्टर
कागदी लिंबू : २४ हेक्टर
सीताफळ : २३ हेक्टर
शाश्वत शेतीकडे वाटचाल
फळबाग लागवडीत झालेली ही मोठी वाढ शेतकऱ्यांच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतीक मानली जात आहे.
कमी जोखमीसह दीर्घकालीन उत्पन्न, बाजारपेठेतील संधी आणि शासकीय योजनांचा लाभ यामुळे फळबागा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील हा बदल आगामी काळात इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
