Agriculture News : यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हाती येणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासहपंजाबमध्ये पाहायला मिळाली. पुरामुळे अनेक ठिकाणच्या जमिनीचं खरडून गेल्या आहेत, त्यामुळे रब्बी पिके घेणे कठीण झाले आहे. या अडचणी लक्षात घेता, या राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या लागवडीसाठी मदत करत आहे.
देशातील महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल आदी राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला. या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. संबंधित राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांना मदत पॅकेजही जाहीर केले आहे. दुसरीकडे पंजाब सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. पंजाब सरकार १३ ऑक्टोबरपासून पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत गहू बियाणे देणार आहे.
पंजाब सरकारने एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी करत म्हटले आहे की, १३ ऑक्टोबरपासून, पाच एकरपेक्षा कमी पूरग्रस्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना राज्य कृषी विभाग कार्यालयांकडून मोफत गहू बियाणे मिळण्यास सुरुवात होईल. १.८५ लाख हेक्टर जमिनीसाठी मोफत बियाणे वाटण्यासाठी पंजाब राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (PUNSEED) ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लाभांसाठी अर्ज कसा करावा
बाधित शेतकऱ्यांना विभागाच्या पोर्टलवर (www.agrimachinerypb.com) नोंदणी केल्यानंतर आणि त्यांच्या जमिनीच्या मालकीची माहिती आणि ओळखपत्रे अपलोड केल्यानंतरच बियाणे मिळेल. या अर्जांची लवकरच पडताळणी केली जाईल आणि पडताळणी केल्यानंतर, शेतकऱ्यांना मोफत गहू बियाणे मिळू शकेल. पीएयू-शिफारस केलेल्या बियाण्यांची किंमत ४ हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
कर्ज परतफेडीची तारीख वाढवली
याव्यतिरिक्त, पंजाब सरकारने या वर्षीच्या खरीप पिकासाठी घेतलेल्या अल्पकालीन कर्जाची परतफेड करण्याची तारीख वाढवली आहे. खरीप हंगामात कर्ज घेतलेले शेतकरी आता पुढील वर्षी ३१ जानेवारीऐवजी ३० जूनपर्यंत कर्ज परतफेड करू शकतात.