जळगाव : ज्या शेतकऱ्यांची जमीन सामाईक क्षेत्रात आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. तहसीलदारांचे प्रतिज्ञापत्र घेऊन सामाईक क्षेत्र धारकांना कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने शनिवारी घेतला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच मागणीसाठी जिल्हाभरातून शेतकरी बँकेत आले होते.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक १८ एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संचालक किशोर पाटील, गुलाबराव देवकर, चिमणराव पाटील, डॉ. सतीश पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
दि. १ एप्रिल २०२३ पासून अनिष्ट तफावतीत असलेल्या विकास सोसायट्यांवरील व्याज आकारणी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतला. यामुळे सोसायट्यांचा अनिष्ट तफावतीचा डोंगर वाढणे थांबले असून, बँकेने सुमारे २०४ कोटी रुपयांचे व्याज माफ करून या संस्थांना आर्थिक जीवदान दिले आहे.
सामाईक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज न देण्यासंदर्भात बँकेने परिपत्रक काढले होते. मात्र त्याला जिल्हाभरातील शेतकरी व विकासोंनी विरोध केला. संचालक मंडळाच्या बैठकिपूर्वीच शेतकऱ्यांनी विरोधाचे पत्र दिले. शेतकऱ्यांनी संचालक मंडळाची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर बँकेने निर्णय मागे घेतला.
बँकेकडून थेट कर्जवाटप आणि वसुलीचा धडाका
शेतकरी सभासदांना कर्जासाठी पायपीट करावी लागू नये, यासाठी बँकेने थेट कर्ज वाटप सुरू केले आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. मार्च २०२६ अखेर या कर्जाची वसुली २४ टक्क्यांपर्यंत झाली आहे. सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात बँकेने रुपे किसान कार्डाद्वारे १०९५ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे.
सामाईक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळताना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यावर तोडगा म्हणून तहसीलदारांचे प्रतिज्ञापत्र घेऊन कर्ज देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बँकेचा संचित तोटा ८६.१७ कोटींपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आले असून, बैंक आता पूर्णतः सक्षम झाली आहे.
- संजय पवार, चेअरमन, जिल्हा बँक
