नाशिक : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने पारा चाळिशीवर पोहोचला आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने वांग्याचे बाजारभाव कोसळून खाली आले आहे. यामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर रस्त्याच्या कडेला वांगी फेकण्याची वेळ आली आहे.
शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आधीच अडचणीत सापडला असताना, बारटोक भरता या व्हरायटीचे लांब असणाऱ्या वांग्याला बाजार समितीत प्रति कॅरेट ५० ते ७० रुपये भाव मिळत आहे. प्रती किलो चार रुपये भाव मिळत असल्याने खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे नियोजन करून शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकरी आधीच धडपड करत आहे. त्यात विहिरी तळ गाठू लागल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहता कोणत्याच पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक भार शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.
पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असून पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
असा आहे एकूण खर्च
- एकरी खर्च एक ते एक लाख वीस हजार
- मशागत - १५ ते २० हजार
- बेड तयार करणे - ४ ते ६ हजार
- मल्चिंग पेपर- ५ ते ६ हजार
- एकूण खते- ४० ते ५० हजार
- मजुरी- एकूण ३० ते ४० हजार
शेतकरी चिंतित
मागील वर्षी में २०२५ पासून पावसाळा संपेपर्यंत जवळपास ८ ते ९ महिने मोसमी व बेमोसमी पाऊस पडला. तेव्हापासून शेतातील अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी पावसाने खराब झालेल्या पिकांना बाजारभाव मिळाला नाही. बाजारभावाची स्थिती कमीच आहे. तब्बल एक वर्षे उलटले, तरी पिकांना बाजारभाव मिळत नाही. परिणामी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून वांगे उत्पादकांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
सध्या कोणत्याच भाजीपाला पिकाला बाजारभाव मिळत नाही. वांगी हे खर्चिक पण उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे, म्हणून लाखो रुपये खर्च करून बारटोक भरता या व्हरायटीच्या वांग्याची लागण केली होती. मात्र, तीन आणि चार रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.
- संतोष डोकफोडे, वांगी उत्पादक, म्हाळसाकोरे.
