गोविंद शिंदे
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथील तरुण शेतकरी मारुती कदम यांनी कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरपीक पद्धतीच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवत शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. (Farmer Success Story)
अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात त्यांनी हळद, कापूस आणि तूर यांचे आंतरपीक घेत फक्त १४ हजार खर्चातून तब्बल १.५७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.(Farmer Success Story)
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड
मारुती कदम यांनी पारंपरिक पद्धतीत बदल करत आधुनिक शेतीकडे वाटचाल केली. त्यांनी 'लाल शेलम' जातीची हळद लागवड करताना पाण्याचे अचूक नियोजन, सेंद्रिय शेणखताचा वापर आणि आवश्यक तेथे रासायनिक फवारणी यांचा योग्य समतोल साधला. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
आंतरपीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग
एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांनी हळदीसोबत कापूस आणि तूर ही आंतरपिके घेतली. यामुळे जमिनीचा पूर्ण क्षमतेने वापर झाला आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. हीच त्यांच्या यशाची मोठी किल्ली ठरली.
उत्पादन आणि उत्पन्नाचा हिशोब
हळद : ७ क्विंटल उत्पादन – १,०५,००० रु. उत्पन्न
कापूस : ४ क्विंटल उत्पादन – ४०,००० रु. उत्पन्न
तूर : १.५ क्विंटल उत्पादन – १२,००० रु. उत्पन्न
एकूण उत्पन्न : १,५७,००० रु.
एकूण खर्च : १४,००० रु.
अशा प्रकारे कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याचे समीकरण त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध केले.
कुटुंबाच्या मेहनतीचा वाटा
या प्रयोगात त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मजुरी खर्च कमी ठेवण्यात याचा मोठा फायदा झाला. नियोजनबद्ध कामामुळे उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
यूट्यूबमधून शिकले नवे तंत्रज्ञान
मारुती कदम यांनी यूट्यूबवरील कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले. सतत नवीन माहिती घेणे आणि त्यानुसार शेतीत बदल करणे, ही त्यांची सवयच त्यांच्या यशामागील प्रमुख कारण ठरली.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
मारुती कदम यांची ही यशोगाथा परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी क्षेत्र, कमी गुंतवणूक आणि योग्य नियोजन यांच्या साहाय्यानेही मोठे उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
कमी गुंतवणूक – जास्त नफा हे सूत्र प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग आता अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
अधिक वाचा : AI Farming : परंपरेला टेक्नॉलॉजीची जोड; 'एआय' गुढीने वेधलं सगळ्यांचं लक्ष
