नाशिक : केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने व वेळेत उपलब्ध करणे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी (Agri stack Registration) करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पूर्वी आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहचविण्यासाठी डिजिटल माध्यम आहे. शासनाच्या विविध योजना, शेतकरी पीक कर्ज, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पी.एम किसान योजनेचे अनुदान...
उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन, नैसर्गिक आपत्ती मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे अनिवार्य आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, आधार सलग्न मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्यातील 7 लाख 84 हजार 736 खातेदारांपैकी 5 लाख 20 हजार 800 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. ॲग्रीस्टॅक उपक्रमामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार असून विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.