Farm Well Damage : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील दुधना, करपरा आणि कसुरा नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक सिंचन विहिरी खचल्या, बुजल्या तर काहींमध्ये गाळ साचून त्या वापरासाठी अयोग्य ठरल्या.(Farm Well Damage)
राज्य सरकारने नुकसानग्रस्त विहिरी दुरुस्तीसाठी अनुदान जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात पंचनामे रखडल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.(Farm Well Damage)
अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतात दीर्घकाळ पाणी साचल्याने उत्पादन हातातून गेले. त्यातच सिंचन विहिरींचे नुकसान झाल्याने पुढील हंगामासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.(Farm Well Damage)
पंचनाम्यांमध्ये विलंब; शेतकऱ्यांचा संताप
नुकसानभरपाईसाठी पहिल्या टप्प्यात ११८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ३४ अर्ज पात्र ठरवून यादी पंचायत समितीकडे पाठवण्यात आली. मात्र या लाभार्थ्यांनाही अद्याप अग्रिम रक्कम मिळालेली नाही.
दुसऱ्या टप्प्यात १७१ शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना, त्यांच्या विहिरींचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. जानेवारी महिन्यात अर्ज सादर करूनही मार्चअखेरपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
अनुदानाची घोषणा; प्रत्यक्षात प्रतीक्षा
राज्य सरकारने खचलेल्या व गाळ साचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये १५ हजार रुपये अग्रिम स्वरूपात, तर उर्वरित १५ हजार रुपये रोजगार हमी योजनेतून देण्यात येणार आहेत. मात्र पंचनामे न झाल्याने ही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.
प्रशासनाकडून निर्देश; प्रत्यक्षात अंमलबजावणी रखडली
नरेगा विभागाकडून तांत्रिक सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांना अर्जांची यादी देऊन तातडीने स्थळ पाहणी व पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही प्रत्यक्ष कामकाजात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
दुरुस्तीच्या प्रतीक्षेत विहिरी
खचलेल्या आणि गाळाने भरलेल्या विहिरींची दुरुस्ती न झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील हंगामावरही याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश
दुसऱ्या टप्प्यातील अर्जांची यादी तांत्रिक सहाय्यकांकडे पंचनाम्यासाठी देण्यात आली आहे. संबंधितांनी तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.- प्रतीक चव्हाण, वरिष्ठ सहाय्यक, नरेगा विभाग.
अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे दुहेरी फटका बसत असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
