मालेगाव : तालुक्यातील काटवण भागातील अनेक गावांना दरवर्षी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. कमी पर्जन्यमान, पाण्याचा अपुरा साठा आणि नैसर्गिक जलस्रोतांची मर्यादा यामुळे गाव अडचणीत सापडते. अशाच परिस्थितीत कजवाडे गावाने दुष्काळावर मात करण्यासाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी ठरत आहे.
गावात प्रथमच तब्बल १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचा शेततळे उभारण्यात आले असून, हा उपक्रम ग्रामविकासाच्या दृष्टीने तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. कजवाडे गावात उन्हाळा सुरू होताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते.
सरपंच दीपाली भामरे यांनी मालेगाव पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून आवश्यक तांत्रिक अहवाल, प्रस्ताव, मोजमाप आणि आराखडे तयार झाले. मनरेगा अंतर्गत खोदकाम व तार कुंपणास मान्यता मिळाली. त्यानंतर पंधरावा वित्त आयोग निधीतून शेततळ्याचे अस्तरीकरण (लाईनिंग) करण्यात आले. उपक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत वेंदे, ल.पा. विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी रवींद्र सूर्यवंशी आणि जलसंधारण अधिकारी देवेश बच्छाव यांनी सहकार्य केले.
शेततळ्याची क्षमता
उभारण्यात आलेले शेततळे १०० फूट x १०० फूट × १० फूट या आकाराचे असून, त्यामध्ये अंदाजे १ कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. योग्य अस्तरीकरणामुळे पावसाळ्यात साठवलेले पाणी उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत टिकून राहू शकणार आहे.
अनेक घटकांना मिळणार दिलासा
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना अल्प दरात टँकरने पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. यामुळे खासगी टँकरपासून दिलासा मिळणार असून अत्यल्प दरात शेतकऱ्यांना शेततळ्यातून पाणी उपलब्ध होणार आहे.
शेततळ्याजवळ गुरांसाठी पाणी उतरण्याची सोय (हाळ) करण्यात येणार असून, उन्हाळ्यात जनावरांना मुबलक पाणी मिळणार आहे. बाजूला स्वतंत्र धोबी घाट उभारण्याची योजना असून, त्यामुळे कपडे धुण्यासाठी सुविधा मिळणार आहे.
कजवाडे गावाला कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत मिळवून देण्यात अडचणी आल्या, पण प्रशासनाच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या विश्वासामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
- दीपाली सागर भामरे, सरपंच, कजवाडे
