अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात संमिश्र प्रगती दिसून येत आहे.(Falbag Yojana)
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात एकूण १,२०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, १० जानेवारीपर्यंत प्रत्यक्षात ७७६ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण करण्यात आली आहे.(Falbag Yojana)
मात्र, उर्वरित ४२४ हेक्टर क्षेत्रावर अद्याप लागवड होणे बाकी असल्याने उद्दिष्टपूर्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Falbaga Yojana)
रोहयो निगडित फळबाग लागवड कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे, रोजगारनिर्मिती करणे तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे हा आहे.
या योजनेअंतर्गत संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा, पेरू, सिताफळ आदी फळपिकांची लागवड करण्यात येत आहे.
जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये फळबाग लागवडीला चांगला प्रतिसाद मिळालेला असला, तरी काही ठिकाणी लाभार्थी निवड, तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, रोपांची उपलब्धता, वेळेवर मंजुरी न मिळणे तसेच हवामानातील बदल यामुळे लागवडीचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.
परिणामी उर्वरित क्षेत्रावर लागवड वेळेत पूर्ण होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांनी उर्वरित ४२४ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
फळबाग लागवड ही केवळ रोजगारापुरती मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरू शकते. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन, लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि वेळेवर रोपवाटप करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रोहयोअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत अपूर्ण असलेल्या क्षेत्रामुळे उद्दिष्टपूर्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Falbaga : सेलूत नवा शेती ट्रेंड; ५०० एकरांवर बहरल्या फळबागा वाचा सविस्तर
