नाशिक : जनजागृती करून, मुदतवाढी देऊनही ई-पीक पाहणीचा (e Pik Pahani) आकडा वाढत नसल्याचे दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात केवळ ४० हजार शेतकऱ्यांनी मुदतीत ई-पीकपेरा नोंदणी केली, ई-पीक पाहणी नोंदविण्यात अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर, काहीवेळा ई-पीक पाहणी करूनदेखील शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) केवळ ४० टक्के शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली असल्याचे दिसून येत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी पुढे यावे याकरिता कृषी विभागाने आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही. अन् आता मात्र शेतकरी त्यासाठी तलाठ्यांकडे चकरा मारत आहेत. ई-पीक पाहणीसाठी अंतिम तारीख १५ जानेवारी अशी होती. दोनदा मुदतवाढ मिळून देखील पीक पाहणीची टक्केवारी कमी झाली आहे.
चार वर्षांपासून बंधनकारक
शासनाने चार वर्षांपासून ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना बंधनकारक केली असून, त्याचा लाभशेतकऱ्यांनाच होत असतो. ई-पीक पाहणीसाठी शासनाकडून काही ठरावीक मुदत दिली जाते. त्या मुदत अगोदर तुम्हाला कोणताही हंगाम असो रब्बी, खरीप त्या अनुसार या ठिकाणी तुम्हाला ई-पीक पाहणी करावी लागते.
अनेकांकडे फोनच नाही; इंटरनेटही स्लो
ई-पीक पाहणी करून त्याची नोंद ऑनलाइन करायची असते. त्यासाठी एन्ड्रॉइड मोबाइल आवश्यक असतो. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे साधा मोबाइल आहे, तर ज्यांच्याकडे एन्ड्रॉइड मोबाइल आहे, तर तेथे इंटरनेट स्लो चालते.
ई-पीक पाहणी कशासाठी महत्त्वाची?
ई-पीक पाहणी म्हणजे शेतकरी आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाइन पद्धतीने करतो. नोंद सातबारा उताऱ्यावर करणे, पीक विमा, नुकसान भरपाई मिळणे, हमीभावाने धान्य खरेदी किंवा विक्री करणे, कर्ज लाभ घेणे, यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. याशिवाय राज्यभरातील पीक पद्धतीचे विश्लेषण करता येते. त्यातून अभ्यास करून आपण पीक घेऊ शकतो.