E-Peek Pahani : रब्बी हंगामातील पिकांची अचूक नोंद व्हावी, यासाठी शासनाच्या महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी मोहिमेला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत असून, १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात केवळ ४६.८३ टक्के ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. (E-Peek Pahani)
त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी २४ जानेवारी २०२६ पूर्वी अनिवार्यपणे नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(E-Peek Pahani)
विहित मुदतीत ई-पीक पाहणी न केल्यास संबंधित शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर पिकाचा रकाना कोरा राहणार असून, याचा फटका भविष्यात शेतकऱ्यांना बसू शकतो. (E-Peek Pahani)
विशेषतः पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई तसेच शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
ई-पीक पाहणी का आहे अत्यंत महत्त्वाची?
अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, शासनाकडून मिळणारी मदत सातबाऱ्यावर नोंद असलेल्या पिकांच्या आधारेच दिली जाते.
जर ई-पीक पाहणी केली नाही, तर:
* सातबाऱ्यावर पीक नोंद होणार नाही
* पीक विम्याचा दावा करताना अडचणी येतील
* नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहू शकतो
ही बाब लक्षात घेता, सर्व शेतकरी बांधवांनी २४ जानेवारीपूर्वी नोंदणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची विशेष व्यवस्था
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नसणे किंवा ॲप वापरताना तांत्रिक अडचणी येणे, या बाबी लक्षात घेऊन महसूल विभागाने विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
शेतकरी 'या' ठिकाणी मदत घेऊ शकतात
संबंधित गावचे तलाठी व कोतवाल
गावात नियुक्त केलेले ई-पीक पाहणी मदतनीस
नजीकचे सीएससी (Common Service Center)
या ठिकाणी शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी मोफत किंवा नाममात्र शुल्कात पूर्ण करून दिली जात आहे.
अँड्रॉइड मोबाइलद्वारे थेट नोंदणीची सुविधा
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महसूल विभागाने 'ई-पीक पाहणी 2.0.15' हे नवीन मोबाइल ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे.
या ॲपद्वारे शेतकरी स्वतःच्या शेतात (बांधावर) जाऊन पिकाचा फोटो, माहिती व स्थान (लोकेशन) अपलोड करू शकतात.
सातबाऱ्यावर अचूक व पारदर्शक नोंद केली जाते. यामुळे चुकीची नोंद टाळता येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे.
वाशिम येथील तालुकानिहाय ई-पीक पाहणीची टक्केवारी
कारंजा : १२२.०५ %
मंगरुळपीर : ८०.३३ %
मालेगाव : ४७.६६ %
मानोरा : ४४.५१ %
वाशिम : ४४.०४ %
रिसोड : २५ .०३ %
रिसोड तालुक्यात ई-पीक पाहणीची टक्केवारी सर्वात कमी असल्याचे चित्र असून, या भागातील शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करण्याची गरज आहे.
ई-पीक पाहणी ही केवळ औपचारिकता नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता २४ जानेवारीपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
