Drip Irrigation System : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि पाण्याची बचत व्हावी या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून बसवलेले ठिबक सिंचन संच अवघ्या अडीच ते तीन वर्षांत निकामी झाल्याचा धक्कादायक प्रकार नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथे समोर आला आहे.(Drip Irrigation System)
कंपनीकडून ७ वर्षांची लेखी गॅरंटी देण्यात आली असतानाही संच खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.(Drip Irrigation System)
लाखोंची गुंतवणूक, पण अपेक्षा भंग
मुरंबा येथील अनंत दत्तूजी बिचारे, सुरेखा बिचारे, दत्तू बिचारे, कैलास बिचारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नांदुरा येथील एजन्सीमार्फत एका खासगी कंपनीचे ठिबक सिंचन संच खरेदी केले होते.
ठिबक खरेदी करताना कंपनीने ७ वर्षांची हमी देत, नळ्यांना छिद्र पडणार नाहीत किंवा त्या खराब होणार नाहीत, असे लेखी आश्वासन दिले होते.
तीन वर्षांतच ठिबक निकामी
प्रत्यक्षात मात्र ठिबक सिंचन संच अवघ्या अडीच ते तीन वर्षांतच निकामी झाले. पाइप ठिकठिकाणी फुटणे, पंक्चर होणे, पाण्याचा दाब नीट न राहणे अशा समस्या निर्माण झाल्याने शेतात पाणी देणे कठीण झाले आहे.
परिणामी पिकांना योग्य पाणी न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
तक्रारीनंतरही ठोस कारवाई नाही
या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या. त्यानंतर कंपनीचे अधिकारी शेतात येऊन पाहणी करून गेले; मात्र पाहणी करूनही बराच काळ उलटून गेला तरी ना नवीन ठिबक संच देण्यात आले, ना नुकसानभरपाई मिळाली. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
न्यायासाठी शेतकऱ्यांची धावपळ
कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रकार फसवणुकीचा असल्याचा आरोप केला आहे.
संबंधित कंपनीला नोटीस देण्यात आली असून, योग्य कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
पिकांवर परिणाम, आर्थिक ताण वाढला
ठिबक सिंचन निकामी झाल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती असून, आधीच खर्च केलेल्या लाखो रुपयांवर पाणी फिरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पाण्याची बचत आणि उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे ठिबक सिंचनच निकृष्ट निघाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
कंपनीने दिलेल्या गॅरंटीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि दोषींवर कारवाई करणे अत्यावश्यक ठरत आहे.
अधिक वाचा : AI Farming : परंपरेला टेक्नॉलॉजीची जोड; 'एआय' गुढीने वेधलं सगळ्यांचं लक्ष
