Dhan Kharedi : शासनाच्या हमीभावाने धान विक्रीसाठी हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली; मात्र प्रत्यक्ष खरेदीत मोठी तफावत उघड झाली आहे.(Dhan Kharedi)
कुही तालुक्यातील चिपळी येथील मार्केटिंग फेडरेशन केंद्रावर तब्बल ४५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना केवळ ८०४ शेतकऱ्यांचेच धान खरेदी करण्यात आले आहे.(Dhan Kharedi)
शासनाने खरेदीचे उद्दिष्ट वाढविले नसल्याने उर्वरित शेतकऱ्यांना धान खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली आहे.(Dhan Kharedi)
नोंदणी मोठी, खरेदी मर्यादित
२३ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २,३७० रुपये दराने आणि ४५ क्विंटलपर्यंत धान विक्रीची संधी देण्यात आली होती. यासोबतच २०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला होता.
या योजनेला प्रतिसाद देत सुमारे ४० हजार क्विंटल धानाची नोंदणी झाली. मात्र, २ डिसेंबरपासून सुरू झालेल्या प्रत्यक्ष खरेदीत केवळ २२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले.
हजारो क्विंटल धान प्रलंबित
सुमारे १८ हजार क्विंटल धान अद्याप खरेदीअभावी अडकून पडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावर आणून ठेवले असून, काहींचे धान अजूनही घरातच पडून आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून प्रतीक्षा करूनही खरेदी न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
मातीमोल भावात विक्री, मोठे नुकसान
आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना अखेर खासगी बाजाराचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
सध्या बाजारात धानाला सुमारे १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल जवळपास ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे हमीभाव आणि बोनसची घोषणा प्रत्यक्षात कागदावरच राहिल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
शेतकऱ्यांची मागणी तीव्र
देवळी कला, आंभोरा, सातारा, चिचाळ या परिसरातील शेतकरी या समस्येमुळे त्रस्त असून, तातडीने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून उर्वरित धान खरेदी करावी, अशी मागणी करत आहेत.
आमदार, खासदार आणि संबंधित मंत्र्यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही होत आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
चिपळी येथील साई राईस मिलचे प्रतिनिधी राजू घोडमारे यांनी सांगितले की, शासनाकडून २२ हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र नोंदणी ४० हजार क्विंटलपेक्षा जास्त झाली आहे.
जिल्ह्यासाठी २ लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट मागितले असले तरी ते अद्याप मंजूर झालेले नाही. उद्दिष्ट वाढल्यानंतर उर्वरित धान खरेदी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे शासन हमीभाव व बोनस जाहीर करते, तर दुसरीकडे मर्यादित उद्दिष्टांमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून धान खरेदी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Dhan Kharedi : धान खरेदी ठप्प; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, पावसाचा वाढता धोका!
अधिक वाचा : Tur Kharedi : नाफेड तूर खरेदी ठप्प; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर
