नंदुरबार : यंदा पाऊस चांगला झाल्याने परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पाण्याची पातळी चांगली आहे. पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे यंदा उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. सध्या शेतशिवारात ऊस लागवडीच्या कामाला वेग आला आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी ऊस लावणीच्या कामाला प्राधान्य देत आहेत. उसाच्या नवनवीन प्रजातीची माहिती घेत उशिरा पक्व होणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या उसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत ऊस लागवड झाल्यास वेळेत तोड होऊन उत्पादन अधिक निघण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीची लगबग करीत आहेत. बदलत्या स्थितीमध्ये भाजीपाला पिकावर होणारा रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट, अवकाळी पाऊस यासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्य पिकांऐवजी ऊस पीक शेतकऱ्यांसाठी सुरक्षित अन् आश्वासक आहे.
कापसानंतर शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य
कापसाच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षांत सतत घट होत आहे. सध्या बाजारात हमीभावापेक्षा कमी म्हणजे सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी ऊस लावणीचा पर्याय निवडला आहे. एकरी ५० टनापर्यंतही उत्पादन निघाले, तरी मागील वर्षाच्या दराप्रमाणे एक २ लाख २५ हजार रुपये उसातून उत्पादन निघते. एकरी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला, तरी हमखास उत्पादन निघत असल्यामुळे शेतकरी ऊस शेतीला प्राधान्य देत आहेत.
ऊस लागवडीसाठी मोठा खर्च, कापूस काढणीनंतर शेतीची नांगरणी, रोटाव्हेटर करून सरी काढणे, ऊस लावण्यासाठी बेण्याचा खर्च, मजूर यावर मोठा खर्च करावा लागत आहे. लागवडीपूर्वीची मशागतीसाठी ५ हजार २०० रुपये, खताचा डोस ७हजार रुपये, लावण्यासाठी प्रतिएकर ६ हजार रुपये, तर १० हजार रुपयांचे बेणे असा एकत्रित २८ हजार २०० रुपयांपर्यंत प्रतिएकर खर्च येतो.
- धरमदास पाटील, शेतकरी, सारंगखेडा.
