जयनगर : शहादा तालुक्यातील पूर्व पट्ट्यात जयनगरसह परिसरातील अनेक गावांमध्ये केळी लागवडीला वेग आला आहे. मात्र, मार्चअखेरीस वाढलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे कोवळ्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना क्रॉप कव्हरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
यावर्षी सुरुवातीला केळीला चांगला दर मिळत होता; परंतु सध्या केवळ ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एवढ्या कमी दरातही व्यापाऱ्यांना वारंवार संपर्क करून माल विक्री करावी लागत आहे. दरम्यान, दर कमी असले तरी परिसरात केळी लागवड वाढलेली दिसून येत आहे.
यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरी व कूपनलिकांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी केळी लागवडीकडे वळले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच केळी रोपांची बुकिंग झाल्यामुळे सध्या कमी दर असूनही शेतकरी लागवड करत आहेत. काही शेतकरी मात्र सध्याच्या दरामुळे बुकिंग रद्द करायचे की नाही, याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहेत.
मजूर टंचाई आणि मजुरी दर यामुळे बदलले पीक पॅटर्न
दिवसेंदिवस मजूर टंचाई आणि वाढते मजुरी दर यामुळे शेतकरी कमी मजूर लागणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. केळी पिकाला सुरुवातीला कमी मजूर लागतात आणि शेवटी व्यापारी मजुरांची व्यवस्था करतात, त्यामुळे केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे बालले जात आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच केळी रोपांची बुकिंग
नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच केळी रोपांची मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाल्यामुळे सध्या कमी दर असूनही शेतकरी लागवड करत आहेत.
काही शेतकरी मात्र सध्याच्या दरामुळे बुकिंग रद्द करायचे की नाही, याबाबत संभ्रमात आहेत.
दरम्यान, जे शेतकरी क्रॉप कव्हर 3 वापरत नाहीत, त्यांच्या रोपांवर उन्हाचा परिणाम दिसून येत असून रोपे कोमेजत आहेत.
त्यामुळे खर्च वाढत असला तरी शेतकरी क्रॉप कव्हरचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.
क्रॉप कव्हर, अतिरिक्त खर्चाचा भार
मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानात मोठी वाढ झाल्याने कोवळ्या केळी रोपांवर ताण येत आहे. रोपे वाचवण्यासाठी शेतकरी क्रॉप कव्हरचा वापर करत आहेत. यामुळे रोपांचे संरक्षण होत असले तरी अतिरिक्त खर्चाचा भार वाढत आहे.
