नाशिक : वाढत्या फळबाग (Fruits Farming) क्षेत्रात कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्यासाठी 'सीआरए' तंत्रज्ञान (CRA Technology) अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे मुळांना थेट अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होतो. माळमाथा व दुष्काळी भागांमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकते, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले.
कृषी विभागाकडून (Krushi Vibhag) तालुक्यातील टाकळी येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र शेवाळे यांच्या शेतात हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित सीआरए फळबाग लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी बीजप्रक्रिया, सोयाबीन उगवणक्षमता व माती नमुना याबाबत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी शेतकऱ्यांना सीआरए तंत्रज्ञानाद्वारे बागा अधिक सक्षम बनविण्यासाठी योजनेचा लाभघ्यावा, असे आवाहन केले. उपक्रमात बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक सहायक कृषी अधिकारी मच्छिंद्र साळुंखे, उपकृषी अधिकारी सचिन भगत, मच्छिंद्र साळुंखे व खुशाल देवरे यांनी सोयाबीन उगवण प्रात्यक्षिक, आर. के. आहिरे यांनी तर माती नमुना प्रात्यक्षिक शुभांगी सानप यांनी करून दाखवले.
'सीआरए' तंत्रज्ञान म्हणजे काय?
यात २ बाय २ रुंद आणि २ फूट खोलीचा खड्डा तयार केला जातो. त्यात गांडूळ खत, ट्रायकोडर्मा, शेणखत आणि वाळू वापरून शास्त्रशुद्ध पद्धतीने रोपांची लागवड करण्यात येते. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यात ३ फूट उंचीचे पीव्हीसी पाइप उभे केले जातात, त्यात अन्नद्रव्य व पाणी सोडण्याची व्यवस्था तयार करण्यात येते. परिणामी, थेट मुळांना पाणी व खते पोहोचवता येतात. त्यामुळे मुळांना योग्य अन्नद्रव्य मिळून झाडांचे उत्पादन व आरोग्य वाढते.