बालाजी आडसूळ
एकेकाळी 'पांढरं सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाचा धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः अस्त झाला आहे. (Cotton Farming)
विशेषतः कळंब तालुक्यात कापसाचे अस्तित्व आता नावापुरते उरले असून, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कापूस क्षेत्रात तब्बल ९९ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. (Cotton Farming)
१५ ते २० हजार हेक्टरवर लागवड होणारा कापूस आता 'सिंगल डिजिट'वर आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.(Cotton Farming)
आकडेवारी काय सांगते?
कळंब तालुका : ७८ हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ ५ हेक्टरवर कापूस
धाराशिव जिल्हा : ५.५ लाख हेक्टरपैकी फक्त १७२ हेक्टरवर कापूस
घट : पूर्वीच्या २० हजार हेक्टरच्या तुलनेत ९९% पेक्षा जास्त घसरण
'कॉटन बेल्ट'चा इतिहास आता धूसर
धाराशिवसह मराठवाडा आणि विदर्भ हा भाग एकेकाळी देशातील प्रमुख 'कॉटन बेल्ट' म्हणून ओळखला जात होता.
'देव कापूस'पासून 'बीटी कॉटन' पर्यंत कापसाने मोठा प्रवास केला. नव्वदच्या दशकात या पिकाने व्यापारी पिक म्हणून मोठी झेप घेतली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
शेतकरी कापसापासून दूर का?
कापूस शेती तोट्यात गेल्याने शेतकरी पर्याय शोधू लागले आहेत. यामागील प्रमुख कारणे अशी
उच्च उत्पादन खर्च : प्रति एकर खर्च सुमारे ३५,००० रुपयांपर्यंत
मजुरीचा वाढता बोजा : वेचणीसाठी १०–१५ रु. प्रति किलो
यांत्रिकीकरणाचा अभाव : वेचणी पूर्णतः मजुरांवर अवलंबून
कीड-रोगांचा प्रादुर्भाव : सतत फवारणीचा खर्च
कमी उत्पादन व अनिश्चित भाव
हमीभावात वाढ, तरीही शेतकरी नाराज
गेल्या काही वर्षांत कापसाच्या हमीभावात वाढ झाली असली तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत तो अपुरा ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
२०२१-२२ : ५,७२६ रु.
२०२२-२३ : ६,३८० रु.
२०२३-२४ : ७,०२० रु.
२०२४-२५ : ७,५२१ रु.
तरीही बाजारातील चढ-उतार आणि खर्चामुळे कापूस फायदेशीर राहत नाही.
सोयाबीनकडे कल वाढला
कापसाला पर्याय म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाकडे वळत आहेत. याला अनेक कारणं आहेत.
कमी कालावधी (९०–१०० दिवस)
कमी खर्च
लवकर रोख पैसा
मी दरवर्षी पाच एकर कापूस घ्यायचो; पण यंदा एक गुंठाही केला नाही. खर्च जास्त आणि भाव कमी, त्यामुळे हे पीक परवडत नाही.- राजाभाऊ गंभिरे, शेतकरी
फवारणीचा वाढता खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांची टंचाई यामुळे कापूस शेती तोट्याची ठरत आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत.- भागवत सरडे, तालुका कृषी अधिकारी
भविष्यासाठी इशारा
धाराशिव जिल्ह्यातील कापूस शेतीचे हे चित्र चिंताजनक आहे. योग्य धोरण, यांत्रिकीकरण, हमीभावात वाढ आणि बाजारपेठेतील स्थैर्य याशिवाय पांढरं सोनं पुन्हा शेतात दिसणे कठीण असल्याचे जाणकारांचे मत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाने तोडले रेकॉर्ड; माजलगावात २६८ कोटींची उलाढाल!
