Cotton Crop Damage : अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. (Cotton Crop Damage)
भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदा १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील खरेदी केंद्रे कार्यान्वित झालेली नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीतील कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. (Cotton Crop Damage)
अतिवृष्टी, सततचा पाऊस, ढगाळ वातावरणाने कपाशीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात 'सीसीआय' (CCI) ने १५ ऑक्टोबर रोजी कापूस खरेदी सुरू करणार असा दावा केला होता. परंतु, अद्यापही केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना मागेल त्या दरात विक्री करण्याची वेळ आली. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली नाही. (Cotton Crop Damage)
सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान असून, कापसाचा हंगाम लांबणीवर पडला. यंदा काही भागांत आता सीतादही होत आहे. काहींच्या घरी तर लक्ष्मीपूजनासाठीही नवीन कापूस दिसला नाही. कीड व रोगांमुळे कपाशीच्या बोंडांची गळ झाली. आता लाल्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच शासनाद्वारा आयात शुल्कात कमी केल्याने कापसाच्या दरावर मोठा फटका बसला आहे. (Cotton Crop Damage)
जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर कपाशी
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एक लाख हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र आहे. खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हे २५ टक्के आहे. मात्र, यंदा निसर्गाने साथ न दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
शेतकऱ्यांवर ओढवले आर्थिक संकट
उसनवारी करून कापूस लागवड केली. पण, काढणीला आलेल्या कापसाला पावसाचा तडाखा बसल्याने पीक मातीमोल झाल्याने आर्थिक संकट ओढवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कापसाला यंदा इतका हमीभाव
चालू हंगामासाठी (२०२५-२६) लांब धाग्याच्या कापसासाठी केंद्र सरकारने ८ हजार ११० रुपये प्रतिक्विंटल आणि मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ७१० रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात यापेक्षा कमी दर मिळत आहे.
उत्पादन खर्चही निघत नाही
कपाशीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके मशागत, रासायनिक खते व मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढला. त्यातुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
अकोला जिल्ह्यात ९ सीसीआय खरेदी केंद्र
| मूर्तिजापूर | १ |
| अकोट | १ |
| तेल्हारा | १ |
| चिखलगाव | १ |
| बोरगाव मंजू | १ |
| चिखलगाव (चोहट्टाबाजार) | १ |
| पारस | १ |
| चिखलगाव (दुसरे केंद्र) | १ |
| अकोला (मुख्य केंद्र) | १ |
स्वप्न वाहून गेल्याने पदरी निराशा
सोयाबीन पावसाने खराब झाल्याने कपाशीवर बहुतांश शेतकऱ्यांची भिस्त आहे. मात्र सततचा पाऊस, अतिवृष्टी व कीड-रोगांचा अटॅक यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गतवर्षी सोयाबीनला भाव मिळाला नाही. त्यामुळे कपाशीचे क्षेत्र वाढविले, प्रत्यक्षात यंदा कापसाला भाव नाही व उत्पादनही कमी होत आहे उत्पादन खचार्चावर आधारित कापसाचे दर मिळावे, म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. - भीमराव सदाशिव, शेतकरी
सीसीआयने कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू केले नसल्याने हा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे आणि पांढऱ्या सोन्याला भाव नाही. यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात झाली आहे.- राजेश पावडे, शेतकरी
कापूस भिजला, दरात घसरण
काही भागांत पावसाने पहिल्या वेचणीचा कापूस भिजला. त्यामुळे प्रतवारी खराब होऊन दरात घसरण झालेली आहे. त्यामुळे अशा प्रतवारीच्या कापसाला फारच कमी भाव मिळत आहे.
अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या वेचणीचा थोडाफार कापूस घरी आणला आहे. परंतु, सीसीआयच्या खरेदी केंद्रावर पूर्ण क्षमतेने खरेदी सुरू झाली नसल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा सविस्तर : Crop Loan : बँकांच्या विलंबामुळे रब्बी हंगामातील पीककर्जाचे वाटप अडचणीत
