Chilli Farming : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, त्याचा परिणाम यंदाच्या पीक निवडीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. (Chilli Farming)
कापूस व इतर पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवडीकडे वळत असून, भोकरदन तालुक्यात यंदा मिरची लागवडीत सुमारे २५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.(Chilli Farming)
वडोद तांगडा, भोरखेडा, सेलूद, वालसावंगी या भागात सध्या मिरची लागवडीची जोरदार तयारी सुरू आहे.(Chilli Farming)
मागील हंगामात मिरचीला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी अनेकांनी यंदा पीक पद्धतीत बदल करत मिरचीची निवड केली आहे.
रोपांची मोठ्या प्रमाणात बुकिंग
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत १० लाखांहून अधिक मिरची रोपांची बुकिंग केली असून, लागवडीपूर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ७० टक्के लागवड पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
खर्च जास्त, पण नफ्याची अपेक्षा
एक एकर मिरची लागवडीसाठी अंदाजे ५० हजार रुपयांचा खर्च येतो. यात मल्चिंग, ठिबक सिंचन, खते, कीडनाशके, मजुरी आणि रोपे यांचा समावेश असतो.
जरी प्रारंभीचा खर्च जास्त असला तरी योग्य उत्पादन आणि बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
मागील वर्षी मिरचीला चांगला दर मिळाल्याने यंदा १० एकर क्षेत्रात मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्च जास्त असला तरी उत्पादन चांगले मिळाल्यास फायदा होईल.- बाळासाहेब काकडे , शेतकरी
पाणीसाठा मुबलक; सिंचन सुरळीत
यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा टिकून आहे. तसेच पाणीसाठा मुबलक असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
जमिनीत ओलावा असल्याने मिरची लागवडीसाठी उत्तम परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहोत.- गणेश बारोटे, शेतकरी
सुरुवातीला मिळतो चांगला भाव
हिरव्या मिरचीला हंगामाच्या सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे एप्रिलमध्ये लागवडीवर भर देण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती दिसून येते. योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
चांगला पाऊस, मुबलक पाणी आणि मागील वर्षी मिळालेले चांगले दर या तिन्ही घटकांमुळे भोकरदन तालुक्यात मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढत आहे.
यंदा लागवडीत अपेक्षित वाढ झाल्यास स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
