गजानन वाघ
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात रानमेव्याचा हंगाम सुरू झाला असून सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी व परिसरात सध्या 'चिघोर' या पारंपरिक रानभाजीची चांगलीच चलती आहे.(Chighor Vegetable)
मार्च ते मे या कालावधीत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या भाजीकडे सध्या खवय्यांचा मोठा ओढा दिसून येत आहे. विशेष म्हणजे, बाजारपेठेत ८० रुपये प्रतिकिलो दर असूनही चिघोरला मोठी मागणी कायम आहे.(Chighor Vegetable)
नैसर्गिक आणि पोषक रानभाजी
चिघोर ही पूर्णपणे नैसर्गिकरीत्या उगवणारी रानभाजी असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
पारंपरिक आहारात चिघोरला विशेष स्थान असून, ग्रामीण भागात पिढ्यान् पिढ्या ही भाजी आवडीने खाल्ली जाते.
रानातून थेट बाजारात
सध्या लिहाखेडी परिसरातील अनेक नागरिक सकाळ-सायंकाळ रानात जाऊन चिघोर गोळा करताना दिसत आहेत. काही महिलांनी याचा छोटा व्यवसाय सुरू केला असून रानातून गोळा केलेली ताजी भाजी थेट स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणली जाते. यामुळे त्यांना पूरक उत्पन्नाचा स्रोतही मिळत आहे.
चव आणि आरोग्याचा संगम
चिघोरची भाजी केवळ चविष्टच नाही, तर शरीराला आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध आहे. उन्हाळ्यात शरीराला हलके आणि पचायला सोपे अन्न आवश्यक असते, अशावेळी चिघोरसारख्या रानभाज्या उत्तम पर्याय ठरतात. त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरातील नागरिकही या भाजीकडे आकर्षित होत आहेत.
परंपरा जपणारी रानभाजी
आधुनिक जीवनशैलीत अनेक पारंपरिक पदार्थ लुप्त होत असताना, लिहाखेडी परिसरातील नागरिकांनी मात्र रानभाज्यांची परंपरा जिवंत ठेवली आहे.
'चिघोर'सारख्या रानभाज्या आपल्या आहारसंस्कृतीचा अनमोल ठेवा आहेत. या भाज्या नैसर्गिक, ताज्या आणि आरोग्यदायी असल्याने त्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे,” असे मत स्थानिक शेतकरी राजू डापके यांनी व्यक्त केले.
शहरांकडे वाढती मागणी
रासायनिक घटकांपासून मुक्त आणि नैसर्गिक चवीची ही भाजी आता शहरांच्या बाजारपेठेतही पोहोचू लागली आहे. आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने सेंद्रिय आणि नैसर्गिक अन्नपदार्थांना प्राधान्य दिले जात असून चिघोरसारख्या रानभाज्यांची मागणी वाढत आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीसोबतच आलेली चिघोरची ही मेजवानी केवळ चविष्ट नाही, तर आरोग्यदायीही आहे.
पारंपरिक आहारसंस्कृती जपतानाच ग्रामीण भागातील लोकांसाठी ती उत्पन्नाचे साधन ठरत आहे. त्यामुळे चिघोरसारख्या रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे.
अधिक वाचा :Wheat Management : गव्हाचे काड जाळताय? थांबा! 'हा' उपाय न केल्यास जमिन होईल उजाड
