Shetkari Karjmafi : राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने बँकांकडून ५४ रकान्यात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली.
त्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने राज्य सरकारला सादर केली आहे. आता मेअखेर मंत्रिमंडळात कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अंदाजे ३४ ते ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे प्राथमिक माहिती आहे.
सहकार विभागाने कर्जमाफीच्या अनुषंगाने बँकांकडून तब्बल ५४ रकान्यात शेतकऱ्यांची माहिती मागविली होती. त्यात बँकेची शाखा, आयएफसी कोड, संस्था आयडी, सभासद क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, लिंग, जात (प्रवर्ग), मोबाईल क्रमांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, अॅग्रीस्टॅक क्रमांक, जमीन रेकॉर्ड प्रकार, ग्राहक आयडी, बचत खाते क्रमांक, २०२२-२३ मधील खाते क्रमांक, मंजूर कर्ज रक्कम, कर्ज वितरीत दिनांक, वितरीत रक्कम, पीककर्ज संयुक्त खाते आहे का, पिकाचे नाव, कर्ज कालावधी, परतफेडीची मुदत, प्रत्यक्ष परतफेडीची तारीख, परत केलेली मुद्दल रक्कम, व्याज व परत केलेली एकूण रक्कम, अशी माहिती आहे.
२०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षातील ही माहिती आहे. बँकांनी त्यांच्याकडील तीन वर्षातील थकबाकीदार व नियमित कर्जदारांची माहिती त्या रकान्यात भरून सहकार विभागाला पाठविली. आता सरकारकडून निकष निश्चित केले जात आहेत. त्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभमिळेल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात
कर्जमाफीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एप्रिलमध्येच अहवाल सरकारला सादर केला आहे. आता सहकार विभागाने देखील १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळातील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली आहे.
३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कर्ज बँकांना भरावे लागणार आहे. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.
