चामोर्शी : पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक आणि अधिक नफा देणाऱ्या शेतीकडे वळण्यासाठी चामोर्शी व आष्टी येथील शेतकऱ्यांच्या 'धरती मां' समूहाने छत्तीसगडमधील कोंडागाव येथील प्रसिद्ध 'मां दंतेश्वरी हर्बल फार्म'ला अभ्यास भेट दिली. यावेळी एक एकर शेतीतून वार्षिक ५ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न कसे घेता येते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या शेतकऱ्यांनी अनुभवले.
या भेटीदरम्यान अनुराग त्रिपाठी यांनी शेतकऱ्यांना २५ एकरांतील फार्मची सविस्तर माहिती दिली. ऑस्ट्रेलियन सागवानच्या झाडावर काळ्या मिऱ्याची वेल चढवून मिरीचे उत्पादन आणि त्याखाली आंतरपीक म्हणून काळी हळद, अश्वगंधा, सफेद मुसळी यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड कशी केली जाते. केवळ एका एकरातून मिरी आणि आयुर्वेदिक वनस्पतींच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करण्याचे गणित यावेळी मांडले.
चामोर्शीत होणार नवा प्रयोग
नैसर्गिक आणि बायो-ऑरगॅनिक पद्धतीची लागवड, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचे तंत्र आणि पर्यावरणाचे रक्षण करत केलेली व्यापारी शेती याबाबत त्रिपाठी यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात सहभागी झालेले प्रगतिशील शेतकरी आनंदराव लोंढे, किशोर ओल्लालवार, महेश तुम्पल्लिवार, राजेश कोत्तावार, नमुदेव कापगते आणि आष्टी येथील दिलीप बारसागडे यांनी आपल्या शेतात किमान १-१ एकरावर हा प्रयोग राबविण्याचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
दौऱ्यात शेतकऱ्यांनी जाणली यशोगाथा
समूहाचे प्रमुख डॉ. राजाराम त्रिपाठी, जे सहा विषयांत एम.ए. आणि डॉक्टरेट प्राप्त आहेत, त्यांनी सुरुवातीला बँक मॅनेजरची नोकरी सोडून शेती क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात आलेले अपयश पचवून त्यांनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कसे कमावले, याचा प्रवास त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडला. यशोगाथा ऐकून चामोर्शी येथील शेतकरी प्रभावीत झाले. त्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले.
Wheat Market : देशांतर्गत मार्केटमध्ये गव्हाचे दर घसरले, महाराष्ट्रात किती टक्क्यांची घसरण, पुढे दर कसे राहतील?
