जळगाव : यंदा विक्रमी तापमानामुळेकेळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सतत ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जात असल्याने केळी बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ परिसरात यंदा विक्रमी तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सतत ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जात असल्याने केळी बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. मुबलक पाणी देऊनही जमिनीतील ओलावा टिकत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
घडांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार
सध्या परिसरात तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. या प्रचंड उष्णतेमुळे जमिनीतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत असून, मुबलक पाणी देऊनही बागांमध्ये आवश्यक ओलावा टिकून राहत नाही. परिणामी झाडांची वाढ खुंटणे, पाने करपणे तसेच घडांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला
यावर्षी खांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. शेणखत, औषध फवारणी, मजुरी, वीजबिल आणि रोपांच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
केळीची लागवड ते कापणीपर्यंत प्रतिघड साधारण १३० ते १५० रुपयांपर्यंत खर्च येतो. तापमान वाढल्यास पाणी व औषधांवरील खर्च आणखी वाढतो. यंदा हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही तीव्र असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
- सोपान नथू महाजन, शेतकरी, बहाळ
बहाळ परिसरात यंदा अतिथंडी आणि नंतर वाढलेल्या तापमानामुळे केळी बागांवर सलग संकटे येत आहेत. शेतकरी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून दर्जेदार माल तयार करतो. परंतु बाजारातील भाव मात्र व्यापारी ठरवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. केळीला हमीभाव मिळावा.
- राजेंद्र गरबड महाजन, केळी उत्पादक, बहाळ
कांद्याचे दर कोसळून 50 पैसे प्रति किलोवर, दर घसरण्याची कारणे काय आहेत? वाचा सविस्तर
