युनूस नदाफ
वादळात केळी गेलीच... आता झाडं काढायलाही लागतोय हजारोंचा खर्च लागतोय, अशी परिस्थिती सध्या केळी उत्पादकांची झाली आहे. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात शून्य, आणि संकट मात्र डोंगराएवढं. केळीचं नुकसान तर झालंच, पण आता पडलेली झाडं काढण्यासाठीही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. (Banana Crop Damage)
निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांच्या कष्टावर अक्षरश: पाणी फेरले आहे. अर्धापूर तालुक्यातील निमगाव, चोरंबा, सोनाळा, चाभरा, खैरगाव, रोडगी, शेणी, देळूब आदी परिसरातील हजारो हेक्टरवरील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळली आहे. (Banana Crop Damage)
परिणामी, हातात आलेले केळी उत्पादन गेलेच; पण आता पडलेल्या झाडांचे घड बाहेर काढण्यासाठीही शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. (Banana Crop Damage)
केळी गेलीच, पण घड काढण्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिकदृष्ट्या अधिकच खर्चीक आहे. खरीपाच्या तोंडावर या संकटामुळे अनेकांनी दुसरे पीक घेण्याचा विचारदेखील थांबवला आहे. आता फक्त शासनाच्या मदतीची आशाच शिल्लक राहिली आहे. (Banana Crop Damage)
वादळात केळी बागा उद्ध्वस्त
मागील काही दिवसांपासून बाजारात केळीला चांगला भाव मिळत होता. मात्र, पिक भुईसपाट झाल्याने अचानकच बाजारात केळीची आवक वाढली आणि भाव गडगडले. त्यामुळे मेहनतीचे चीज झाले नाही. शेतकऱ्यांच्या मते, वादळी वाऱ्यामुळे एका रात्रीत महिन्यांच्या मेहनतीचे नुकसान झाले आहे.
एक झाड उचलायला ७ ते १० रुपये खर्च
केळीचे झाड उभे असताना त्याचं व्यवस्थापन सोपं असतं, मात्र तेच झाड जमिनीवर पडल्यानंतर त्याला शेताच्या बाहेर काढण्यासाठी कामगार लागतात.
मजूर एका झाडासाठी ७ ते १० रुपये खर्च घेतात. एका एकरात सुमारे १५०० झाडे असल्यामुळे एकाच एकरासाठी १० ते १५ हजारांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो.
आर्थिक मदतीची मागणी वाढली
शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. महसूल विभाग नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करत असला, तरी मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांचं संकट अधिकच गहिरे होत आहे. लोकप्रतिनिधींनी पाहणी केली असली, तरी केवळ पाहणीने शेतकऱ्यांचे डोळे पुसले जात नाहीत, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
वादळी वाऱ्यात संपूर्ण केळीची झाडे जमिनीवर पडली आहेत. आता ती झाडं बाहेर काढण्यासाठी मजूर एका झाडाला ७ ते १० रुपये घेत आहेत. एका एकरात सुमारे १५०० झाडं असल्यामुळे खर्च परवडणारा नाही. शासनाने मदत केली, तर शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. - एक केळी उत्पादक शेतकरी