Avakali Paus: पावसाच्या प्रत्येक थेंबामागे फक्त मातीच नव्हे, तर शेतकऱ्यांचे श्रम, आशा आणि भविष्यही मिसळलेले असते. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. (Avakali Paus)
घरांचे छप्पर उडाले, पिके जमीनदोस्त झाली आणि स्वप्नं मात्र चिखलात रुतून बसली आहेत. आता उरली आहे ती केवळ एकच अपेक्षा तातडीच्या मदतीची. वाशिम जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने कहर केला असून, सात घरांबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळी पिके जमीनदोस्त झाली आहेत. (Avakali Paus)
विशेषतः वाशिम आणि मालेगाव तालुक्यांतील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तर विजेचा धक्का लागून एका गुराचा मृत्यू झाल्याचीही दुर्दैवी घटना घडली आहे. (Avakali Paus)
सात घरांचे नुकसान, वाऱ्याचा जोर जबरदस्त
या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे रिसोड तालुक्यातील ३, मालेगावमधील २, मंगरुळपीरमधील १ आणि कारंजा तहसीलमधील १ अशा एकूण ७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. काही घरांची छप्परे उडाली तर काही घरांना भिंती पडण्याचे प्रकार घडले आहेत.
वाशिम आणि मालेगावात २१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
उन्हाळी पिकांवरही या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.
* वाशिम तालुक्यातील एका गावात १६ शेतकऱ्यांचे अंदाजे १० हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी मूग पीक पूर्णतः नष्ट झाले आहे.
* तसेच मालेगाव तालुक्यातील दोन गावांमध्ये १० शेतकऱ्यांच्या सुमारे ११ हेक्टर क्षेत्रातील मूग व ज्वारीचे पीक पूर्णपणे खराब झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी, पंचनाम्याची मागणी
या अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, अनेकांनी पीककर्जे काढून शेती केली होती. आता पिके जमीनदोस्त झाल्यामुळे नुकसान भरपाईची जोरदार मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
विजेच्या धक्क्याने गुराचा मृत्यू
याशिवाय मालेगाव तालुक्यात विजेचा धक्का लागून एका गुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही बाबही संबंधित पशुपालकासाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पंचनामे व मदतीची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.