Anudan Vatap Ghotala : शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानावर डल्ला मारल्याचे प्रकरण चांगले तापले आहे. जालना जिल्ह्यात तब्बल ४० कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून, यामध्ये केवळ तलाठ्याच नव्हे तर तहसीलदार व कृषी सहाय्यकही अडचणीत आले आहेत. (Anudan Vatap Ghotala)
आता दोन तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू होणार असून, आणखी कारवाईची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या अनुदान वाटपात तब्बल ४० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. (Anudan Vatap Ghotala)
याप्रकरणी २१ तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता दोन तहसीलदारांवरही विभागीय चौकशीची कारवाई होणार आहे. तसेच १७ कृषी सहायकांचे खुलासे प्रशासनास प्राप्त झाले असून त्यांच्याही चौकशीची प्रक्रिया सुरू आहे.(Anudan Vatap Ghotala)
अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके
घनसावंगीच्या तत्कालीन तहसीलदार योगिता खटावकर
या दोघांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. याविषयीचा अधिकृत प्रस्ताव मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
२०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा निधी (अनुदान) जाहीर केला होता. परंतु, अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट लाभार्थी, चुकीची यादी, दुबार वाटप अशा प्रकारांची तक्रार झाली. यामुळे सुमारे ४० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले.
२१ तलाठ्यांवर निलंबन, आता कृषी सहायकांच्या खुलाशांची तपासणी
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रथम २१ तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली. आता ग्रामसेवक आणि कृषी सहायकांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
आतापर्यंत १७ कृषी सहायकांचे खुलासे प्राप्त झाले असून
उर्वरित अधिकाऱ्यांचे खुलासे लवकरच अपेक्षित आहेत.
दोषी आढळल्यास निलंबन व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
दोन अधिकाऱ्यांचे प्रस्ताव
अनुदान वाटप घोटाळ्यात चौकशी समितीने दोन अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत. तहसीलदार चंद्रकांत शेळके, योगिता खटावकर यांची विभागीय चौकशी करण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी सादर करण्यात आलेले आहेत, तसेच १७ कृषी सहायकांच्या खुलाशांची तपासणी सुरू आहे.
- गणेश महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना.
ठळक मुद्दे (Key Highlights)
* २०२२-२०२४ मध्ये झालेल्या अनुदान वाटपात ४० कोटींचा घोटाळा
* अंबड व घनसावंगी तालुक्यांत मोठा आर्थिक गैरव्यवहार
* २ तहसीलदारांवर विभागीय चौकशीची शिफारस
* २१ तलाठी निलंबित
* १७ कृषी सहायक चौकशीत
* बनावट लाभार्थी व दुबार अनुदान वाटपाचे प्रकार
शेतकऱ्यांना दिला जाणारा सरकारी निधी जर प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीच अपहार केला तर सामान्य शेतकऱ्यांच्या न्यायाची आशा कोणी करायची? या गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.