Anudan Vatap Ghotala : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून देण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात तब्बल २५ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा मोठा घोटाळा उघड झाला आहे.(Anudan Vatap Ghotala)
या प्रकरणी २२ तलाठ्यांसह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.(Anudan Vatap Ghotala)
घोटाळ्याचे तपशील
२०२२ ते २०२४ या काळात अतिवृष्टी, गारपीट व दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावेळी सरकारने आर्थिक मदतीसाठी अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता बोगस लाभार्थ्यांची नावे दाखवून आणि बनावट कागदपत्रे तयार करून २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा निधी बेकायदेशीररीत्या वळविण्यात आले.
संगणक प्रणालीचा गैरवापर करून, बनावट एन्ट्रीज टाकून आणि खोटी कागदपत्रे दाखल करून हा घोटाळा राबविण्यात आल्याचा ठपका आहे.
कारवाईची सुरुवात
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर अंबड येथील सहायक महसूल अधिकारी विलास मल्हारी कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा रजिस्टर नंबर ४५३/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवला गेला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
आरोपींची यादी
या प्रकरणी खालील २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात २२ तलाठींचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. यात गणेश रुबिंदर मिसाळ, कैलास शिवाजीराव घारे, विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर, बाळू लिंबाजी सानप, पवनसिंग हिरालाल सुलाने, शिवाजी श्रीधर ढालके, कल्याणसिंग अमरसिंग बमनावत, सुनील रामकृष्ण सोरमारे, मोहित दत्तात्रय गोषिक, चंद्रकांत तुकाराम खिल्लारे, रामेश्वर नाना जाधव, डिगंबर गंगाराम कुरेवाड, किरण रवींद्रकुमार जाधव, रमेश लक्ष्मण कांबळे, सुकन्या श्रीकृष्ण गवते, कृष्णा दत्ता मुजगुले, विजय हनुमंत जोगदंड, निवास बाबूसिंग जाधव, विनोद जयराम ठाकरे, प्रवीण भाऊसाहेब शिनगारे, बप्पासाहेब रखमाजी भुसारे, सुरज गोरख बिक्कड त्यांची नावे आहेत.
सहायक महसूल अधिकारी : सुशील दिनकर जाधव
नेटवर्क इंजिनिअर : वैभव विशंभरराव आडगांवकर
संगणक परिचालक (तत्कालीन) : विजय निवृत्ती भांडवले
महसूल सेवक : रामेश्वर गणेश बारहाते
महसूल सहाय्यक : आशिषकुमार प्रमोदकुमार पैठणकर, निलेश सुखानंद इंचेकर (मृत), दिनेश बेराड
चौकशी सुरूच
या प्रकरणात अंबड व घनसांवगी तालुक्याचे तत्कालीन तहसीलदारांवर विभागीय चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नसल्याने प्रशासनावरील प्रश्नचिन्ह कायम आहे.
शेतकऱ्यांसाठी असलेली मदतच लुटल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. २५ कोटींच्या या घोटाळ्यामुळे शासनाची विश्वसनीयता धोक्यात आली असून, या प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.