विजय मुंडे
जालना : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक स्मार्ट आणि नफ्याची करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.(AI Sheti)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सॅटेलाइट डेटाच्या सहाय्याने उसासह फळबागांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.(AI Sheti)
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या उत्पादनात दीड पटीने वाढ करण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला आहे.(AI Sheti)
सॅटेलाइट अन् एआय : शेतीसाठी नवे शस्त्र
हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पाऊस, कीड-रोगांचा अचानक प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
या समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाने मुंबईतील 'फाईन ॲबिलिटी सायन्स' संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव प्रकल्प राबवला आहे.
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना थेट मोबाईल ॲपच्या माध्यमातून सॅटेलाइटशी जोडले जाईल. यामध्ये लागवडीपूर्वी जमिनीचा पोत तपासण्यापासून ते कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर एआय (AI) मार्गदर्शन करणार आहे.
मोबाईलवर मिळणार संपूर्ण मार्गदर्शन
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना खालील बाबींची अचूक माहिती मोबाईलवर मिळणार आहे.
पिकांना पाणी कधी द्यावे
खतांची योग्य मात्रा किती असावी
संभाव्य कीड व रोगांचा अंदाज
हवामानातील बदलांची पूर्वसूचना
यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी निर्णय घेता येणार असून, पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येईल.
खर्चात बचत, उत्पादनात वाढ
पारंपरिक शेतीत खते व औषधांवर मोठा खर्च होतो, जो अनेकदा अनावश्यक असतो. मात्र एआय तंत्रज्ञानामुळे केवळ आवश्यक तेवढ्याच संसाधनांचा वापर होणार आहे.
उत्पादन खर्च कमी होईल
नफा वाढेल
शाश्वत शेतीला चालना मिळेल
'ब्रँड ॲम्बेसेडर' ठरणार शेतकरी
या प्रकल्पासाठी निवडलेले ५० शेतकरी आता या तंत्रज्ञानाचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून ओळखले जातील. त्यांच्या प्रयोगातून मिळालेल्या यशाच्या आधारावर हा प्रकल्प जिल्हाभर विस्तारण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
शेतीत तंत्रज्ञानाची नवी दिशा
जालना जिल्ह्यात सुरू झालेला हा प्रयोग केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरण्याची शक्यता आहे. सॅटेलाइट आणि AI मदतीने शेती अधिक अचूक, कमी खर्चिक आणि जास्त उत्पादनक्षम बनवण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे.
प्रशासनाचा विश्वास
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होईल.-आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी
वर्षभर शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. ऊस आणि फळबागांसाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल. भविष्यात इतर पिकांपर्यंतही याचा विस्तार केला जाईल.- जी. आर. कापसे, हा अधीक्षक कृषी अधिकारी.
