Agriculture Shop Strike :खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी सेवा केंद्र संचालकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे हिरवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.(Agriculture Shop Strike)
बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा उपलब्ध नसल्याने मिरची लागवडीचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Agriculture Shop Strike)
मिरची लागवडीवर परिणाम
वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरवी मिरचीची लागवड केली जाते. दरवर्षी अक्षय्य तृतीयापासून शेतकरी मिरची बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करतात.
एप्रिल अखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात बियाणे पेरून रोप तयार केले जाते आणि जूनच्या सुरुवातीला पुनर्लागवड केली जाते.
मात्र, यंदा कृषी सेवा केंद्रे बंद असल्याने बियाणे खरेदीच लांबली असून त्यामुळे रोप निर्मितीही रखडण्याची शक्यता आहे. परिणामी संपूर्ण लागवड चक्र उशिरा सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नर्सरी संचालकांचाही प्रश्न गंभीर
हिरवी मिरची नर्सरी चालवणाऱ्या शेतकऱ्यांनाही या संपाचा फटका बसत आहे.
दरवर्षी दोन ते तीन लाख रोपे तयार करतो. तयारी सुरू आहे, पण बियाणेच मिळत नसल्याने पुढे काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- महेंद्र भड, नर्सरी संचालक.
खत साठ्यावरही परिणाम
शेतात पक्के रस्ते नसल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खतांचा साठा आधीच करून ठेवतात. मात्र, दुकाने बंद असल्याने खत खरेदीही ठप्प झाली आहे.
सहा महिने पुरेल एवढा खत साठा आधीच करून ठेवावा लागतो. पण आता दुकाने बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. - मनोज ठाकरे, शेतकरी
संपामागील कारण काय?
हा संप शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच आहे. शासनाच्या धोरणांमुळे कृषी सेवा केंद्र चालवणे कठीण झाले आहे. तालुका किंवा जिल्हास्तरावर निर्णय घेणे आमच्या हातात नाही.- अतुल गांधी, कृषी सेवा केंद्र संघटना पदाधिकारी
शेतकऱ्यांची कोंडी, भविष्यातील चिंता
संपामुळे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा मिळत नसल्याने लागवड उशिरा होण्याची शक्यता आहे. मिरचीसारख्या नगदी पिकासाठी वेळेवर लागवड अत्यंत महत्त्वाची असते. उशीर झाल्यास उत्पादनात घट आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
कृषी सेवा केंद्रांचा संप आणि शासन-व्यवस्थेतील तणाव याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेली ही परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Pik Vima : शेतकऱ्याला न्याय मिळाला… पण कसा? वाचा प्रकरण सविस्तर
अधिक वाचा : Soybean Market : सोयाबीनने घेतली झेप; ६ हजार पार दर, अजून वाढणार का?
