Kanda Nuksan : राज्यात ६ मे पासून सुरू असलेल्या बेमोसमी, मोसमी पावसामुळे (Unseasonal Rain) कांद्यासह शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मागील काही महिन्यांत स्वस्त दरात विक्री झालेल्या कांद्यासाठी अनुदान आणि नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी.
या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक (Kanda farmer) शेतकरी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवली आहेत. पत्रावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
काय म्हटलंय पत्रात....
६ मे पासून संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यास विजांच्या कडकडाटासह मुसळधार, अति मुसळधार ढगफुटी सदृश्य अशा स्वरूपाचा पाऊस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याच्या पिकाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असतानाच या बेमोसमी पावसामुळे हजारो हेक्टर वरील कांदा काढणी वाचून शेतातच सडला आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढला होता, परंतु तो साठवणूक करण्याचा शिल्लक होता. अशा शेतकऱ्यांचा कांदाही शेतातच भिजून गेला आहे. राज्यात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सोलापूर, बीड धाराशिव ,सांगली, बुलढाणा, अकोला, परभणी, जालना आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु दररोजच्या बेसुमार पावसामुळे हजारो टन कांदा शेतातच सडला आहे. यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्य सरकारने अति तातडीने कांद्यासह इतर सर्व शेतमालाच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अति तातडीची नुकसान भरपाई द्यावी. तसेच तसेच शेतातच पुर्णपणे सडून नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना एकरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, स्वस्तात कांदा विक्री झालेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २ हजार रुपयांचे अनुदान द्यावे.
तसेच राज्यातून केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या तीन लाख टन कांद्याची थेट बाजार समित्यांतून शेतकऱ्यांचाच कांदा ३ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावा. याबाबत कठोर अंबलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने आपणाकडे करत आहोत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.