नाशिक : आडत दुकानदाराने टोमॅटो खरेदी (Tomato Kharedi) करून सात महिने झाले तरी शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये दिले नाही. याबाबत यापूर्वी तीन वेळा आंदोलने करून आश्वासनांशिवाय काहीही हाती आले नसल्याने सकाळी शेतकऱ्यांनी अचानक लिलाव बंद पाडले. ठोस निर्णय झाल्याशिवाय लिलाव सुरू करू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.
अखेर पोलिस, बाजार समिती आणि आंदोलक यांनी चर्चा करून येत्या १७ तारखेपर्यंत सर्व पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पाच तासांच्या खंडानंतर कांदा व टोमॅटोचे लिलाव पुन्हा सुरू झाले.
पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गुरुकृपा आडत या पेढीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे टोमॅटो खरेदी केले होते, मात्र सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे दिले नाही. यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांनी तीन वेळा आंदोलने केली.
मात्र, आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे सोमवार दि. २ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आक्रमक होत कांदा लिलाव बंद पाडले. मात्र, त्यानंतर जवळपास पाच तासाने गुरुकृपा आडतदार आप्पा होळकर यांनी जमिनीचा व्यवहार झाला असून पैसे आल्यावर देणार असल्याचे सांगितले.
आठ महिने विलंब
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या गुरुकृपा आढतने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून दिंडोरी, निफाड आणि बांदवड तालुक्यातील टोमॅटो उत्पादकांचे जवळपास अडीच कोटी रुपये थकविले आहेत. मात्र, आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळाले नाही.
हे पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कांदा व टोमॅटोचे लिलाव बंद पाडले. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याची मनस्थितीत नव्हते. दुपारी दोन वाजता बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर शिरसाठ, सचिव लोंढे यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
१७ जून पर्यंत आडतदार अप्पा होळकर यांनी सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट केली जातील, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. थकीत रकमेसाठी चौब्यांदा टोमॅटो उत्पादकांनी आंदोलन केले, मात्र त्यांना पुन्हा तारीखच मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बाजार समिती आवारामध्ये तणावाचे बातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर है आंदोलन मागे घेण्यात आले.
ओझर आणि पिंपळगाव येथील दोन व्यापाऱ्यांनी मला फसवले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये थक्कले आहेत. जमीन विकून सदर शेतकऱ्यांचे पैसे मी देणार आहे. १७ तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील.
- आप्पा होळकर, गुरुकृपा आडत, पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव बाजार समितीमध्ये २४ तासाच्या आत रोख पेमेंटची तरतूद आहे. मात्र, काही बोगस व्यापाऱ्यांमुळे येथील आडतदार थकीत झाले. मात्र, आता आडतदाराच्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे. १७ तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळतील.
- ज्ञानेश्वर शिरसाठ, उपसभापती, पिंपळगाव बाजार समिती