- किशोर मराठे
Agriculture News : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar district) अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट परिसरात पाणी उतारावरून वाहत असल्याने शेती पिकांना पाणी मिळणे मुश्कील झाले होते. यावर देवबारीच्या रॅन्चोने वीस फुटाचे दोन प्लास्टिकचे पाइप एकमेकांना जोडून त्यांना बारीक छिद्रे पाडून पाण्याची गती (Wastage Water) कमी केली. पिकांना जागोजागी पाणी झिरपून पाणी दिले जात आहे. यामुळे उतारावरील शेतात पीक बहरू लागले आहे.
देवबारीपाडा येथील वसंत रावल्या वसावे या शेतकऱ्याची दोन ते अडीच एकर शेती डोंगरमाथ्याच्या उतारावर आहे. या उताराच्या भागात पिकांना पाणी देण्यासाठी अडचणीचे ठरत होते. पिकांना पाणी सोडताना उत्तारामुळे वाहून वाया जात होते. उतारावरील पिकांना पाणी अडवून पिकांना पाणी कसे मिळेल व कसदार माती वाहून जाणार नाही, यावर वसंत वसावे यांनी दोन पाइप एकमेकांना जोडले. बारीक छिद्रे करून पाण्याच्या गतीचा वेग कमी केला. त्यांनी अडीच एकर उताराच्या शेतात भगर व मका पिकाची लागवड केली आहे.
डोंगर उताराची जमीन असली कि अशावेळी जे पिकांना पाणी दिले जाते. ते उतारानुसार वाहून जात असते. त्यामुळे ते पाणी पिकांना फायदेशीर ठरत नाही. कालांतराने शेतातील माती देखील वाहून जाऊ लागते. उतारामुळे पाण्याचा प्रवाहाला गती असते, ते अधिक तीव्रतेने खाली वाहून जाते. याच पार्श्वभूमीवर या शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवत पाण्याचा कमी वापर करत पिकांना संरक्षित पाणी देण्याचा जुगाड यशस्वी केला आहे.
एक आयडिया जो बदल दे दुनिया
वसंत वसावे यांच्यासह कालूसिंग हान्या तडवी व सुरूपसिंग हावसिग वसावे हे तिघे शेतकरी आळीपाळीने एकमेकांच्या शेतातील पिकांना पाणी या पाइपलाइनद्वारे देत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सामूहिक पद्धतीने यशस्वीरीत्या शेती करीत असून, हाती भरघोस उत्पन्न घेत आहेत.