Agriculture Crisis : बाजारातील दरघटीमुळे हतबल झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या सहा वर्षांच्या मेहनतीवर पाणी सोडत थेट संपूर्ण पेरू बाग उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक येथे घडली आहे.(Agriculture Crisis)
उच्चशिक्षित शेतकरी ओम अमानकर यांच्या या निर्णयाने कृषी व्यवस्थेतील गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.(Agriculture Crisis)
सहा वर्षांची मेहनत एका दिवसात संपली
अमानकर यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी सहा एकर क्षेत्रावर ३,५०० पेक्षा अधिक पेरूची झाडे आधुनिक पद्धतीने लावली होती. योग्य व्यवस्थापन, सिंचन आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बागेत चांगले उत्पादनही मिळत होते.
मात्र, बाजारात पेरूला मिळणारा दर सतत घसरत गेला. उत्पादन खर्च वाढत असताना विक्री दर १० रुपयांखाली येऊ लागल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले.
खर्च वाढला, भाव कोसळले
खत, मजुरी, औषधे, वाहतूक अशा सर्व घटकांचा खर्च वाढत असताना पेरूला योग्य बाजारभाव मिळत नव्हता. परिणामी, उत्पादन विकूनही खर्च वसूल होत नसल्याने सलग तोटा सहन करावा लागत होता.
सहा वर्षे तोटा सहन केल्यानंतर अखेर त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण बाग काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला.
शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. बागायती पिकांसाठी स्थिर बाजारपेठ नसल्याने आणि भावातील चढ-उतारामुळे शेतकरी मोठ्या जोखमीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हमीभाव व बाजारव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर बागायती पिकांसाठी हमीभाव, नियोजित बाजारपेठ आणि आर्थिक संरक्षण यांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, वाढते खर्च आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.
प्रशासनाने हस्तक्षेपाची गरज
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून बागायती पिकांसाठी हमीभाव, प्रक्रिया उद्योगांना चालना, बाजारपेठेचे नियोजन, निर्यात संधी वाढवणे यांसारख्या उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा घटना वाढण्याची भीती आहे.
भंडारज बुद्रुक येथील ही घटना केवळ एका शेतकऱ्याची कहाणी नसून संपूर्ण कृषी व्यवस्थेतील अस्थिरतेचे प्रतीक आहे. मेहनतीने उभी केलेली बाग एका क्षणात नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणे, ही चिंताजनक बाब असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
आधुनिक शेती करूनही उपयोग नाही
आधुनिक पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेतले, पण योग्य दर मिळाला नाही. सहा वर्षे तोटा सहन केल्यानंतर निराश होऊन हा निर्णय घ्यावा लागला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.- ओम अमानकर, शेतकरी
