येवला : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः परिणामी करपा, अळी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढून विविध पिकांचे उत्पादन घटले आहे. यावर्षी रमजान महिना फेब्रुवारीत आल्याने उन्हाळी फळांना विशेषतः टरबुजाला मोठी मागणी आहे. मात्र अतिवृष्टी आणि हवामानातील लहरी बदलांमुळे बाजारात टरबुजाची आवक घटल्याने भाव वधारले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतही तालुक्यातील नागडे येथील शेतकरी समाधान साताळकर यांनी धाडसाने चार एकर क्षेत्रात टरबुजाची मल्चिंग पेपरवर लागवड केली. प्रति एकर सुमारे ८० हजार रुपये खर्च करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला. अतिवृष्टीचा परिणाम, त्यानंतरची थंडीची लाट आणि रोगराई यामुळे उत्पादन काहीसे घटले.
शिवाय तणनाशक व रोगनाशक फवारणी करण्यावरही अधिक खर्च करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तरीदेखील सध्या बाजारात टरबुजाला प्रति किलो २२ ते २५ रुपये दर मिळत असल्याचे साताळकर यांनी सांगितले. त्यांना चार एकरांतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा लहरी वातावरणामुळे आणि गेल्या वर्षी योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी टरबूज बाबत उदासीनता दाखवली. परिणामी सरासरीपेक्षा टरबूज उत्पादन कमी झाल्याने परदेशातदेखील कलिंगडाची मागणी वाढली आहे.
तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अंदाज यामुळे यश
अतिवृष्टीने अनेकांचे नुकसान झाले असले तरी समाधान साताळकर यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अचूक अंदाज याच्या जोरावर यश मिळवून दाखवले आहे.
यापूर्वीही टरबूज पिकाची लागवड केल्याचा अनुभव आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीत कृषी अधिकाऱ्यांचे आपण मार्गदर्शन आणि सल्ला घेतला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर यशस्वी होऊ शकलो.
- समाधान साताळकर, टरबूज उत्पादक
