Krushi Salla: वाढत्या उन्हात पिकांची कशी काळजी घ्यावी याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने दिलाय कृषी सल्ला (Krushi Salla) ते वाचा सविस्तर
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील २४ तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर २ ते ३ दिवसात हळूहळू ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. (Krushi Salla)
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील २४ तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर २ ते ३ दिवसात हळूहळू ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. (Krushi Salla)
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १३ मार्च दरम्यान पाऊस सरासीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी १४ ते २० मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची (Krushi Salla) शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
* ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी.
* काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी व माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी करून घ्यावी.
* उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.
* उन्हाळी तीळ पिकास खताची दुसरी मात्रा देतांना त्यासोबत गंधक २० किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
* काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
* जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
* कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे डाळींब बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
* जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे.
* नविन लागवड केलेल्या डाळींब रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
* काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, चिकू बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
* जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी चिकू फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
भाजीपाला
* काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* सध्याच्या उष्ण वातावरणामुळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड २० % एसपी २ ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
* कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे.
* पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयुक्त, खनिजमिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
* जनावरांचा घरी खुराक तयार करतांना सरकी/खापरी पेंड दूध वाढत म्हणून ३३% पेक्षा जास्त वापरली तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढून दूधातील जनावरे महिनोंमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसायात ही काळजी घ्यावी.
(सौजन्य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)