Join us

सोलापूर जिल्ह्यात खरीप पेरणीला सुरवात; कोणत्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:58 IST

४ जून रोजी जिल्ह्यात दमदार पावसाने पावसाळ्याची सुरुवात झाली होती. ४ जून रोजी जिल्ह्यात एकूण १३ तर पाच जून रोजी १४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

सोलापूर : ४ जून रोजी जिल्ह्यात दमदार पावसाने पावसाळ्याची सुरुवात झाली होती. ४ जून रोजी जिल्ह्यात एकूण १३ तर पाच जून रोजी १४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा मे व जून महिन्यात ४ जूनपर्यंत २३४.७ मि.मी. पाऊस पडला आहे.

मागील वर्षी चार जून रोजी कडक उन्हाचे रूपांतर पावसाचे ढग जमवण्यात झाले व त्याच दिवशी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली.

एक-दोन तालुके वगळता कमी-अधिक प्रमाणात इतर तालुक्यात चार जून रोजी १३ मि.मी. पाऊस पडला होता. त्यानंतर सलग १२ दिवस दररोज चांगला पाऊस पडत होता.

बिगर मोसमी पावसाने विश्रांती घेताच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरली आहे.

यंदाही शेतकऱ्यांनी बाजरीपेक्षा मका पेरणीला अधिक प्राधान्य दिल्याचे पेरणी झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी रविवारपर्यंत सुमारे ५,७५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी उरकून घेतली आहे. शेतकऱ्यांनी 

यावर्षी १३ मे ते ३० मेपर्यंत १७ दिवस जिल्हाभरात भरपूर म्हणजे एकूण २३३ मि.मी. पाऊस पडला आहे. जून महिन्यात अवघा १.४ मि.मी. इतका पाऊस पडला असला तरी मे व जून महिन्याचा एकूण पाऊस २३४.७ मि.मी. इतका झाला आहे.

खरीप पेरणीला सुरुवात...दमदार पावसामुळे जमिनीत झालेल्या ओढीमुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. उडीद पेरणीवर शेतकऱ्यांचा भर असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पेरणी झाले होते. मात्र सोयाबीनचा बाजार वर्षभरात सावरला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पेरणीविषयी दुय्यम स्थान आहे. खरीप पेरणीची सुरुवात जिल्ह्यात झाली असली तरी कृषी खात्याकडे त्याची नोंद नाही. 

वाफसा येताच पेरणीला सुरुवात..यंदा उन्हाळ्यातच मान्सूनपूर्व बिगर मोसमी मुसळधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवामान खात्याचे अंदाज फोल ठरले. गेल्या १३ दिवसांत तालुक्यातील मंडलनिहाय सरासरी २१० मिमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक पेरणीचे वेध लागले होते. कधी एकदाचा पाऊस विश्रांती घेतोय याची शेतकरी वाट पाहत होता. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जमिनीत वाफसा येताच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर यांत्रिकी तसेच बैलाकरवी खरिपाच्या पेरणीसाठी सुरुवात केली आहे.

तालुक्यात ज्या भागात पेरणीयोग्य चांगला पाऊस झाला आहे. अशा ठिकाणी बाजरी, मका, तूर आदी पीक पेरणी करावी. पाऊस लांबलाच तर बाजरी पीक तग धरू शकते, तसे मका तग धरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो संरक्षित पाण्याची उपलब्धता असेल तेथे मका पेरणी करावी. - दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

अधिक वाचा: आता कृषीपूरक व्यवसायांसाठी या योजनेतून मिळणार ५० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज; वाचा सविस्तर

टॅग्स :पेरणीखरीपपीकशेतीशेतकरीसोयाबीनमकासोलापूरपाऊसमोसमी पाऊस