नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील व परिसरातील दोन कुपटी शेतशिवारात आठवड्यांपासून रानडुक्कर व रोहींचा उपद्रव वाढला आहे. हे वन्यप्राणी रबी हंगामातील पिकांची नासाडी करीत असून, वन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, टाळकी ज्वारी व इतर भाजीपाला पिके जोमात आहेत; परंतु रोही, रानडुक्कर, हरिण, वानर आदी वन्यप्राणी शेतशिवारात बहरलेल्या पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून, वन विभागाकडे किती तक्रारी कराव्यात, असे शेतकरी सांगू लागला आहे.
तक्रारी मांडल्या; परंतु उपाययोजना नाही
• कुपटी परिसरातील काही शेतकऱ्यांनी वन विभाग कार्यालयात भेटून आपली व्यथा मांडली आहे; परंतु त्या तक्रारीवरून काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीत.
• वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 'आम्ही दिवस-रात्र मेहनत करून शेतात पिके वाढवली; पण वन्यप्राणी, पिकांची नासाडी करीत आहेत' यास जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाईची मागणी
• काही शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या शेतात झालेले नुकसान दाखवूनही पिकांची भरपाई त्यांना मिळाली नाही.
• शेतकऱ्यांना आशा आहे की वन विभाग उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देईल; परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळाच अधिक दिसत आहे.
• रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
