साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, बाजार समित्या आणि इतर शेतकऱ्यांच्या संस्था लुटून अनेक पदाधिकारी मालामाल झाले आहेत. अशा पदाधिकारी व त्यांना साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्या संपत्तीची सी.आय.डी. अथवा ई.डी. मार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी केली आहे.
शेडगे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सहकारी संस्थांच्या दूरवस्थेस भ्रष्टाचार करून मालामाल होणारे पदाधिकारी आणि त्यांना साथ देणारे अधिकारी जबाबदार आहेत. कालपर्यंत एका खोलीत राहाणारे, मोटरसायकलवर फिरणारे, हे अचानक बंगला, किमती गाड्या, हॉटेल, पेट्रोल पंप, फार्महाऊस, प्लांटिंग आणि शेकडो एकर जमीन अशा प्रकारची मालमत्ता मिळवतात.
शेतकऱ्यांच्या संस्थांना लुटून कमविलेल्या पैशांवर हे राजकारण करतात, निवडणुकीत पैसा उधळून मतदारांची खरेदी करतात. मात्र जेव्हा संस्था दिवाळखोरीत जाते, तेव्हा शासनाकडे पदर पसरतात. ही शासनाची व सभासद शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेडगे यांनी म्हटले आहे.
तसेच शेडगे यांनी संस्थांचे कार्यकारी संचालक, सचिव इत्यादी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीचीही मागणी केली आहे. कारण पदाधिकारी या अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय भ्रष्टाचार करू शकत नाहीत. त्यामुळे पदाधिकारी आणि अधिकारी यांचे गैरव्यवहारात संगनमत असते.
हेही वाचा : हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय
