पुणे : खरेदी-विक्रीच्या दस्ताची सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, ई-हक्क प्रणालीवरील अर्ज आदींच्या नोंदीत तक्रार नसेल आणि एक महिन्याच्यावर अर्ज प्रलंबित ठेवता येणार नाही.
कारण तसे असेल तर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधला जाणार आहे. त्यात ज्यांच्याकडे अर्जाची प्रलंबितता जास्त आहे, अशांना त्याचे ठोस कारण द्यावे लागणार अथवा तो अर्ज निकाली काढावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कूळ कायदा शाखेत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यासाठी दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांची (तलाठी) नेमणूक करण्यात आली आहे.
तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडील नोंदी वेळेत मंजूर होत आहेत का, किती नोंदी प्रलंबित आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी 'डॅशबोर्ड' वर कार्यालयाकडील गावनिहाय उपलब्ध असते.
परंतु आता प्रलंबित नोंदी निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षातील कर्मचारी प्रलंबित नोंदी असलेल्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या नोंदी निकाली काढण्यासाठीच्या सूचना देणार आहेत. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर आता थेट जिल्हाधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.
जमीन खरेदी-विक्रीच्या दस्तावरून उताऱ्यावर नोंद घेणे, विश्वस्तांचे नाव बदलणे आदी सातबारा उताऱ्यावरील बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे आदींचे फेरफार नोंदविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन किंवा तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करावा लागतो.
तलाठी त्या नोंदीचा फेरफार करून तो मान्यतेसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन पाठवितात. मात्र, काही तलाठ्यांकडून फेरफार नोंदविला जात नाही. काही मंडल अधिकारी तो जाणीवपूर्वक मंजूर करण्यास विलंब करतात. यामुळे फेरफार प्रलंबित असण्याचे प्रकार वाढत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातून देखरेख
दस्त नोंदणीत, खरेदी-विक्रीमध्ये, वारस नोंद करणे आदी अर्जामध्ये कोणाचा वाद नसेल किंवा हरकत नसल्यास नियमानुसार एका महिन्याच्या आत या दोन्ही नोंदी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दोन तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या अर्जावर देखरेख करणार आहेत.
सातबारा उताऱ्यावरील प्रलंबित असलेल्या विविध नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी संनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या नोंदींबाबत कक्षातून संपर्क साधला जाईल. - सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी
अधिक वाचा: Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव