'पनीर'चे खाद्यपदार्थ अनेकांना आवडतात. घरच्या जेवणापासून ते हॉटेल, ढाबे, कॅफे आणि फास्टफूड सेंटरपर्यंत पनीर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
मात्र, हेच पनीर आता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे चित्र आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोग्याशी हा जीवघेणा खेळ सुरू असताना अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
नफा मिळवण्याच्या अधिक लालसेपोटी काही उत्पादक पनीर तयार करताना दुधाऐवजी स्टार्च, कृत्रिम दुधाचे घटक, वनस्पती तूप, वॉशिंग सोडा, डिटर्जंट्स आणि रासायनिक न्यूट्रलायझर्सचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे.
या कृत्रिम मिश्रणातून पनीरसारखा रंग, आकार आणि घट्टपणा निर्माण केला जातो; मात्र त्यात पोषणमूल्य शून्य असते. काही वेळा त्यातून रासायनिक दर्पही जाणवतो, जो आरोग्यासाठी इशारा मानला जातो.
असे ओळखा शुद्ध पनीर
◼️ खरे पनीर नैसर्गिक पद्धतीने दुधापासून बनते.
◼️ त्याचा पोत मऊ, किंचित तुटक व चव ताजी असते.
◼️ याउलट बनावट पनीर रबरसारखे कडक, खूप चिकट किंवा शिजवताना पाण्यात मिसळते.
असे ओळखावे नकली पनीर
◼️ नकली पनीर ओळखण्यासाठी घरच्या घरी करता येतील अशा सोप्या चाचण्या आहेत.
◼️ उकळत्या पाण्यात पनीर टाकल्यावर ते वितळणे किंवा आयोडिन घातल्यावर निळसर रंग येणे, यावरून त्यात स्टार्चचा वापर झाल्याचे स्पष्ट होते.
◼️ न्यूट्रलायजरमुळे पनीरमध्ये आंबटपणा जाणवत नाही पण हे रसायन शरीरासाठी घातक आहे.
भेसळयुक्त पनीर खाण्याचे दुष्परिणाम
◼️ अशा पनीरचे नियमित सेवन केल्यास ॲसिडिटी, पोटदुखी, जुलाब, पचनसंस्थेचे विकार तसेच यकृत आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याचा धोका वाढतो.
◼️ लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध यांच्यासाठी हा धोका अधिक गंभीर ठरतो असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.
उपययोजना
◼️ आपल्या अन्न पदार्थामध्ये पनीर मोठ्या प्रमाणावर वापरात असले, तरी आपण खात असलेले पनीर खरे आहे की बनावट, याची खात्री अनेकांना नसते.
◼️ पनीर रोजच्या आहारात सामील झाले आहे. मात्र त्यामागचे वास्तव अजूनही अनेकांच्या लक्षात आलेले नाही ही बाब चिंतेची आहे. त्यामुळे ग्राहकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.
◼️ खूप स्वस्त पनीर खरेदी करण्यापेक्षा गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे.
◼️ नागरिकांनी पनीर खरेदी करताना त्याचा रंग, वास आणि पोत तपासावा.
◼️ शक्य असल्यास घरच्या घरी पनीर तयार करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
◼️ अन्न सुरक्षा विभागाने तपासणी अधिक कडक करून नकली पनीर विक्रीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अधिक वाचा: नऊ महिन्यात तब्बल साडेअकरा लाखांचे उत्पन्न; हळद पिकात 'या' शेतकऱ्याने केली किमया
