अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तथा औषधी सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवारफेरीत शनिवार आणि रविवारी शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
शेतकऱ्यांनी पिकांऐवजी पारंपरिक फळे, भाजीपाला, फुलपिके, औषधी सुगंधी वनस्पती अशा नगदी पिकांच्या शेतीकडे वळावे तसेच विदर्भात या पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढावे.
त्यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अनुभवता यावे, यादृष्टीने कृषी विद्यापीठाने कृषी विभागाच्या सहकार्याने २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी दोन दिवसीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले.
या शिवारफेरीत विदर्भातील जिल्ह्यांतील विविध शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचा अत्यल्प सहभाग आढळून आला. शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याच्या स्थितीत शिवारफेरीसाठी केलेल्या नियोजनावर पाणी फेरले आहे.
नियोजन कोलमडले !
शिवारफेरीत विदर्भातील १ लाख १० हजार शेतकरी सहभागी होतील. अशा प्रकारचे नियोजन होते. मात्र नियोजन कोलमडल्या चित्र दिसत होते.
अधिकारी, विद्यार्थ्यांचीच गर्दी भारी!
शिवार फेरीत शेतकऱ्याची बोटांवर मोजण्याइतकीच उपस्थिती दिसत होती आणि कृषी विद्यापीठ, कृषी विभागासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी व विद्यार्थ्यांचीच भारी गर्दी होत असल्याचे वास्तव शिवारफेरीच्या दोन दिवसांत बघावयास मिळाले.
शेतकरी कामात व्यस्त; शिवारफेरीत येतील कसे?
सध्या हरभरा, गहू या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील कामात व्यस्त आहेत. शेतातील कामाची लगबग सुरू असताना शेतकरी शिवारफेरीत येतील कसे, असा प्रश्न उपस्थित करीत, कामाची वेळेत शिवारफेरी ठेवल्याने शेतकरी दिसत नसल्याचे शिवारफेरीत सहभागी बाळापूर तालुक्यातील हसनापूर येथील दामोदर राऊत, नांदुरा तालुक्यातील धाडी येथील एकनाथ बाटे, अमरावती येथील संजय देशमुख, प्रणव बिजवे, हिमज देशमुख या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.
शेतकऱ्यांनी फळे, भाजीपाला, फुलपिके, औषधी सुगंधी वनस्पती अशा नगदी पिकांकडे वळावे, या संदर्भातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत व्हावे, यासाठी शिवारफेरीच्या तयारीसाठी मेहनत घेण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शिवारफेरीचा लाभ घेणे अपेक्षित आहे. - डॉ. धनराज उंदीरवाडे, विस्तार शिक्षण संचालक, कृषी विद्यापीठ.
