Pune : राज्यातील महिला मधमाशीपालकांसाठी एक खास बातमी असून, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने सन २०२६ या वर्षाकरिता “मधुमित्र मधुमक्षी पुरस्कार” देण्यात येणार आहेत. यासाठी नामांकन अर्ज ४ मे २०२६ अखेर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील महिला मधमाशीपालकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
दरम्यान, राज्यात मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने कमी असून त्यातच महिला शेतकऱ्यांसाची संख्या खूपच कमी आहे. विशेष म्हणजे खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून यंदा खास महिलांसाठी एक पुरस्कार राखीव ठेवण्यात आला आहे.
यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले असून त्याअनुषंगाने राज्यातील विविध विभागाकडून शेतकरी महिलांसाठी उपक्रम राबवले जात आहेत. राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी ही एक खास संधी असणार आहे.
या पुरस्कारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार दिले जाणार असून, त्यापैकी एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये अशी आहे.
जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य (२० मे) साधून जिल्ह्यास्तरीय कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराची लिंक https://mskvib.org संकेस्थळावर आहे. नामांकन अर्ज जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी (संपर्क क्रमांक ०२०-२५८११८५९) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
