सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरिपाचे नुकसान झाले असले तरी रब्बीसाठी हाच पाऊस पोषक ठरला आहे. पश्चिम विदर्भात यंदाच्या रब्बीसाठी सरासरी ९.१३ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत १०.४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ११४.३६ टक्केवारी आहे.
यामध्ये गव्हाची क्षेत्रवाढ झालेली आहे. परिणामी दशकात यावर्षी रब्बीचे सर्वाधिक पेरणीक्षेत्र ठरले आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे पुनर्भरण झाल्याने जमिनीत वाढलेली आर्द्रता जिरायती हरभऱ्यासाठी पोषक ठरलेली आहे. शिवाय भूजलस्तरात वाढ झाल्याने गव्हाच्या सिंचनाला पाणी उपलब्ध आहे.
अशा परिस्थितीत गव्हाचे सरासरी क्षेत्र २.२५ लाख हेक्टर असताना सद्यस्थितीत ३.०३ लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही १३४.५४ टक्केवारी आहे. त्यातुलनेत हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ६.३९ हेक्टर असताना ६.२६ लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही ९७.९८ टक्के आहे. या दोन पिकांमध्ये रब्बीचे ९० टक्के पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये तेलबिया क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे.
पीकनिहाय पेरणीक्षेत्र (हेक्टर)
रबी ज्वारी - १७,०६६
गहू - ३,०२,७८९
मका - ४३,५९०
हरभरा - ६,२६,६०६
करडई - १,३३०
जवस - २९.६०
तीळ - ३७६.६०
सूर्यफूल - ५९
मोहरी - २५७.४०
चिया सीड - ९०८३
शेतात पाणी साचल्याने नुकसान
खरिपाच्या हंगामात सर्व पावसाची सरासरी पार झाली. ऑक्टोबरपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. शिवाय अतिवृष्टीने शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले व सरासरी उत्पादनात कमी आल्याने शेतकऱ्याची मदार रब्बी हंगामावर आहे.
